Breaking News

गडकिल्ल्यांसाठी भाजपचा पुढाकार

पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न रोखण्याचे दक्षता समितीचे कार्य

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत चालू झाले आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 18) केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या साथीने शिवसेनेचे सरकार नोव्हेंबर 2019मध्ये सत्तेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते व त्यांच्यामुळे आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोईने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत.

ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून व चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्याविरोधात छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले पण संभाजीराजे यांनी आवाज उठवला. दुर्दैवाने राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडू लागले आहेत. शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा बोर्ड झळकला. या प्रकारांविरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशिर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे.

ते म्हणाले की, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे आणि तो पक्ष गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करत असला तरी भाजप शिवरायांच्या इतिहासात बदल करणे सहन करणार नाही. त्यामुळेच आपण पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे एक दक्षता समिती स्थापन करत आहोत. भाजप खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे निवेदन देऊन नुकतेच या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकार कारवाई करेलच, पण पक्ष म्हणून भाजपही या विषयावर पाठपुरावा करेल.

असे असेल समितीचे कार्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपची प्रदेश दक्षता समिती ही गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल. त्यानंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल. समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, सदस्य खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी आमदार नितीनराजे शिंदे,  सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश महिला मोर्चा चिटणीस वर्षा डहाळे, समितीचे मार्गदर्शक भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर असतील.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply