मुंबई : प्रतिनिधी
विदर्भाच्या संघाला सलग दुसर्यांदा रणजी करंडक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या वासिम जाफरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे जाफरने म्हटलेय. शेष भारताविरुद्ध सुरू असलेल्या इराणी करंडकाच्या सामन्यादरम्यान जाफर एका खाजगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. विराट सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. प्रत्येक सामन्यागणिक विराटकडून आपल्या अपेक्षा उंचावतच चालल्या आहेत. ज्या पद्धतीने तो स्वतःच्या फिटनेसची काळजी घेतो, त्याच्या फलंदाजीची शैली, मैदानातील त्याचे वावरणे यामुळे प्रत्येक तरुण खेळाडूचा रोलमॉडेल बनला आहे. प्रत्येक सामन्यात विराट एका नवीन विक्रमाला गवसणी घालतो आहे. सध्याच्या घडीला विराटची बरोबरी करेल असा एकही खेळाडू दिसत नाही, असे मत जाफरने व्यक्त केले.2018 साली विराटने आयसीसीचे मानाचे तिन्ही पुरस्कार पटकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. यापुढे भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सामना करायचा आहे. 24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात 2 टी-20 आणि 5 वन डे सामने खेळणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper