Breaking News

अखेरच्या वन डे सामन्यात विजयासह भारत अ संघाने मालिका जिंकली

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे शतक एका धावेने हुकले

मुंबई ः प्रतिनिधी

पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर मात करत मालिकेत 4-1ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुभमन गिलने 69, तर ऋतुराज गायकवाडने 99 धावा केल्या. भारतीय संघाने 33व्या षटकातच वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान पूर्ण केले.

शुभमन गिलने आक्रमक सुरुवात करत 29 चेंडूंत अर्धशतक झळकावले. या मालिकेतले गिलचे हे तिसरे अर्धशतक ठरले. शुभमन गिल फटकेबाजी करत असताना ऋतुराज गायकवाडने एका बाजूने किल्ला लढवत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने ऋतुराजच्या साथीने संघाचा डाव सावरला. ऋतुराजने फटकेबाजी करत भारतीय संघाची धावसंख्या भराभर वाढवण्याकडे कल दिला. 99 धावांवर ऋतुराज माघारी परतला. केवळ एका धावेने त्याचे शतक हुकले. ऋतुराज माघारी परतल्यानंतर कर्णधार मनीष पांडेने श्रेयस अय्यरच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत वेस्ट इंडिज ‘अ’ संघाला 236 धावांवर रोखले. नवदीप सैनीने 10 षटकांत 31 धावा देत दोन गडी बाद केले. त्याला चहार बंधू व कृणाल पांड्याने चांगली साथ दिली. वन डे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 24 जुलैपासून अनौपचारिक कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply