राज्यसभा निवडणुकीवरून किरीट सोमय्यांची शिवसेनेवर टीका
नाशिक : रामप्रहर वृत्त
राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप घोडेबाजार करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. याबाबत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ते नाशिकमध्येे पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप हे फक्त गाढवच करू शकतो, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
राज्यसभा निवडणुकीत राज्यातून भाजपने तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार दिल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. यामुळे अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे. भाजप राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करेल, म्हणजेच अपक्ष आमदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप शिवसेना नेते करीत आहे. या विधानाचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला आहे.
निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल, तर तो करणारा, पाहणारा आणि होऊ देणारा हे सर्व जबाबदार आहेत. म्हणून आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या प्रवक्त्यांचा ताबडतोब जबाब नोंदवण्यात यावा. घोडेबाजार करणार्यांवर कारवाई करायला हवी, असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.
स्वतःच्या पक्षाचे, मित्रपक्षांचे आणि त्यांना समर्थन देणारे आमदार बिकाऊ आहेत, असे उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप हे फक्त गाढवच करू शकतो. मग अप्रामाणिक आमदार कोण आहेत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. भाजप याचे कधीच समर्थन करणार नाही. याविरुद्ध चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, पण हे जर खोटे असेल तर ते बोलणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असेही सोमय्या म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper