Breaking News

आम्हाला कोणाच्या उपदेशाची गरज नाही

जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई : प्रतिनिधी
आम्ही राजकीय काही करत नाही. आम्ही फक्त लोकांना भेटतोय. तेसुद्धा जनतेच्या आशीर्वादानंच बसलेत. ते तर आडमार्गानं बसलेत. निवडून आलेले नाहीत. त्यामुळं आम्हाला कोणी उपदेश देण्याची गरज नाही. सगळे नियम, कायदे पाळूनच आम्ही सर्व करतोय, असा घणाघात केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत गुरुवारी (दि. 19) केला. जनआशीर्वाद यात्रेमुळे करोनाला आमंत्रण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राजकीय पक्षांनी गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेय. याबाबत उत्तर देताना राणे म्हणाले.
यात्रेच्या सुरुवातीला उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. राणेंना स्मृतीस्थळी येऊ न देण्याचा इशारा शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी दिला होता. त्यांना इशारा देतानाच राणे यांनी या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला हाणला.
बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर नारायण राणे यांना पत्रकारांनी गराडा घातला. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेबद्दल राणे काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. राणे यांनी या वेळी बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच वेळी आताच्या नेतृत्वावर घणाघात केला. राणे हे बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोधाची भाषा केली होती. राणेंना शिवाजी पार्कमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. त्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, मात्र तसे काही झाले नाही. याच मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या अन्य नेत्यांना टोला लगावला.
एखाद्या व्यक्तीची, महापुरुषांची किंवा दैवतांची स्मारके असतील तर तिथे कुणीही विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि त्या अनुषंगाने बोलावे, असे राणे म्हणाले. कुणाला काही वाटत असेल तर त्याने स्वत: बोलावे. उगाच डाव्या उजव्यांना पुढे करून फायदा नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. जशास तसे उत्तर देण्यासाठी मी प्रख्यात आहे. माझी तशी ख्याती आहे. त्यामुळे कुणीही माझ्या वाटेत मांजरीसारखे आड येऊ नये, असा इशाराही राणे यांनी दिला.
मुंबई महापालिका जिंकणारच!
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक भाजपच जिंकणार. 32 वर्षांचा पापाचा घडा या वेळी फुटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिका जिंकणे हीच माझी जबाबदारी आहे. फडणवीस, दरेकर अशा सगळ्यांवरच ही जबाबदारी आहे. जबाबदारीचे अद्याप काही ठरलेले नाही, पण मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांनीच मला घडवलं
या वेळी बोलताना नारायण राणेंनी बाळासाहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढेच सांगितले की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेले आहे, दिलेले आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असेच यश मिळव, माझा आशीर्वाद आहेत. असे म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असे मला वाटते, असे राणे म्हणाले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply