मालाला उठाव नाही; रोह्यातील कारखानदार हवालदिल
रोहे : प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे अनेक कारखाने बंद पडले. सध्या काही कारखाने पूर्वपदावर येत असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उत्पादित मालाला मार्केट नसल्यामुळे कारखानदार हवालदिल झाले आहेत, अशी माहिती रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
प्रतिबंधक उपाय, नागरिकांनी घेतलेली स्वतःची काळजी, लसीकरण मोहीम यामुळे कोरोना महामारी आटोक्यात येत होती. कारखाने सुरळीत चालू होऊन उद्योग जगत पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनने डोके वर काढल्याने उद्योग जगताची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून कारखान्यातील उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याचे बारदेस्कर म्हणाले.
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रात 34 कारखाने नोंदणीकृत आहेत. यामधील 28 कारखाने चालू आहेत.
या कारखान्यातून विविध प्रकारचे रंग तयार केले जातात. औषधासाठी लागणारा कच्चा व पक्का माल, रबर केमिकल्स यासह अन्य उत्पादने काढली जातात. त्याची विक्री देशासह परदेशातही केली जाते. तसेच या कारखान्यात देश-परदेशातून कच्चामालही येत असतो. मात्र ओमायक्रॉनमुळे येथे तयार झालेल्या मालाला उठाव नाही, असे बारदेस्कर यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper