कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातून नाशिक-शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली-वाकण असा राष्ट्रीय महामार्ग (क्र. 548 अ) जात असून त्यावरून सतत अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते. या महामार्गावरील वंजारवाडी (ता. कर्जत) येथील पूल धोकादायक झाला असून, या पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
कर्जत तालुक्यात या महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरु आहे. या महामार्गावर वंजारवाडी येथे पेज नदीवर पूल असून त्यांची निर्मिती 1970च्या दशकात करण्यात आली आहे. 50 हुन अधिक वर्षे वयोमान झालेल्या या पुलावर नेहमी खड्डे पडतात. त्यामुळे वाहनचालकांना हा पूल धोकादायक वाटत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. मात्र पुल आणि पुलावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ हाती घेत नसल्याचे दिसून येत आहे.
या पुलाच्या नादुरुस्तीबद्दल स्थानिक रहिवासी कृष्णा जाधव यांनी दोनवेळा आवाज उठवला होता. मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आदिवासी भागातील कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनीही सदर पुलाच्या नादुरुस्तीबद्दल आक्रमक भूमिका घेतली होती.
वंजारवाडी पुलाचे महत्व लक्षात घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे. या ठिकाणी नव्याने पुलाची गरज असून तात्पुरत्या स्वरूपात किमान दुरुस्ती करून घ्यावी आणि वाहनचालकांना तात्पुरता दिलासा द्यावा.
-उदय पाटील, स्थानिक कार्यकर्ते
RamPrahar – The Panvel Daily Paper