Breaking News

कसोटीतही टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’

दुसर्‍या सामन्यासह मालिका न्यूझीलंडने जिंकली

ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्‍यात सलग दुसर्‍या व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात तिसर्‍या दिवशी भारताने दिलेले 132 धावांचे आव्हान यजमान न्यूझीलंडने सात गडी राखत पूर्ण केले. यामुळे वन डेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.
भारताचा दुसरा डाव 124 धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 46 धावांपर्यंत मजल मारली. उपाहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लॅथमने आपले अर्धशतकही साजरे केले. अखेरीस 103 धावांवर उमेश यादवने लॅथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. लॅथमने 52 धावा केल्या, तर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर टॉम ब्लंडलने अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले, मात्र 55 धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. सरतेशेवटी अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसर्‍या डावात भारताकडून बुमराहने दोन, तर उमेश यादवने एक गडी बाद केला.
त्याआधी दुसर्‍या दिवशी 6 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाची तिसर्‍या दिवशीही खराब सुरुवात झाली. हनुमा विहारी टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक बाद झाले. रवींद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव 124 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून दुसर्‍या डावात ट्रेंट बोल्टने चार, टीम साऊदीने तीन, तर डी-ग्रँडहोम आणि वँगर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply