
नवी दिल्ली ः दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट आयोजित तीन दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी उपस्थितीद्वारे भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल सुरू असलेल्या बदलांबाबत तसेच सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हानांबाबत भाष्य केले. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला हवे, परस्पर सहकार्य केले पाहिजे, या गोष्टींचा गैरवापर होणार नाही, युवा पिढी बिघडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. डिजिटल क्रांतीमुळे आपण एक मोठे स्थित्यंतर अनुभवत आहोत. यातून राजकारण, अर्थव्यवस्था, समाजाची पुनर्मांडणी होत आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे सार्वभौमत्व, शासन, नैतिकता, कायदा, हक्क, सुरक्षा यावर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत, असेही ते म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper