कर्जत : बातमीदार – लॉकडाऊनमधून सूट देऊन जनतेला मुभा देण्यात आली आहे, मात्र त्याचा गैरफायदा उठवला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील असंख्य पर्यटक सध्या नेरळ-माथेरान घाटात आणि जुम्मापट्टी येथे येत आहेत. या अनपेक्षित पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी लोकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे सावट पसरले आहे.दरम्यान, स्थानिक आदिवासींनी नेरळ पोलीस ठाण्याच्या निवेदन देऊन त्या पर्यटकांना आवरा अशी विनंती केली असून, त्या सर्वांना नेरळच्या हुतात्मा चौकातून परत पाठवावे, असे आवाहन आदिवासी संघटनेने केले आहे.
पावसाळ्यात कर्जत भागातील धबधबे आणि रिसॉर्टवर मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत असतात. यंदाही पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा नेरळ-माथेरान घाट रस्त्यात आणि जुम्मापट्टी येथे वळावला आहे. दरवर्षी हा परिसर पावसाळयात तीन महिने पर्यटकांनी ओसंडून वाहत असतो. गेले काही दिवस नेरळमध्ये ठाणे जिल्ह्यातील पर्यटक दुपारनंतर आपली वाहने घेऊन येत आहेत. त्यात मागील चार दिवस तर मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन बदलापूरपासून डोंबिवलीपर्यंतचे हौसे नेरळमध्ये येत आहेत. त्यांची वाहने ही जुम्मापट्टी येथे नॅरोगेज मार्गावर असतात.
लॉकडाऊनपासून नेरळ-माथेरान घाटरस्ता पूर्णपणे बंद असून, माथेरान 17 मार्चपासून बंद आहे.त्यामुळे पर्यटक येण्याची शक्यता नाही, मात्र अनलॉकनंतर नेरळ-माथेरान घाट पर्यटकांनी फुलून गेला आहे. शनिवार, रविवार तर 300हुन अधिक वाहने ठाणे जिल्ह्यातून येथे येतात. त्यामुळे स्थानिक आदिवासी लोक नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले. जैतू पारधी यांच्यासह आदिवासी लोकांनी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधिकारी पाटील यांनी तात्काळ गाडी पाठवून जुम्मापट्टी भागात असलेल्या ठाणे जिल्ह्यातून आलेल्या असंख्य पर्यटकांना तेथून बाहेर काढले, मात्र पर्यटक येण्याचे प्रकार दररोज सुरू असून, हे रोखण्यासाठी
नेरळ पोलीस एक चौकी उभारणार आहेत.
जुम्मापट्टी परिसरात 12 आदिवासी वाड्या असून, लॉकडाऊनमुळे आमच्या भागातील तरुणांचे माथेरान येथील रोजंदारी व्यवसाय बुडून गेले आहेत. त्यात रेड झोनमधील लोक आमच्याकडे कोरोना घेऊन येऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कर्जत-कल्याण रोडवरील हुतात्मा चौकातच त्यांना अडवून परत पाठवावे.
-जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ता
जुम्मापट्टी भागातील आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी येणार्या लोकांबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आम्ही तत्काळ तेथे पोहोचून ठाणे जिल्ह्यातून आलेल्या लोकांना बाहेर काढले, पण ही कारवाई सतत करण्यापेक्षा आम्ही माथेरान घाटरस्ता ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या हुतात्मा चौकात बॅरिकेट लावून पर्यटकांना अडवणार आहोत. पर्यटकांनी या भागात येऊ नये; अन्यथा कारवाई केली जाईल.
-अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेरळ
RamPrahar – The Panvel Daily Paper