भाजपची ताकद वाढणार
रांची : वृत्तसंस्था
झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी 14 वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत मरांडी झारखंड विकास मोर्चा भाजपत विसर्जित केला जात असल्याची घोषणा करतील.
बाबूलाल मरांडी यांनी नुकतीच दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या वेळी ओमप्रकाश माथूरदेखील उपस्थित होते. या बैठकीत झारखंड विकास मोर्चाच्या भाजपमधील विलीनीकरणाचा दिवस निश्चित करण्यात आला. याआधी शनिवारी बाबूलाल मरांडी यांनी अमित शहांची भेट घेतली होती. झारखंड विकास मोर्चाने 11 फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल असे समजते. यानंतर याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाईल. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मरांडी यांना घरवापसीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper