मुंबई : प्रतिनिधी
सुधारित कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 8) ’भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या बंदवर जोरदार टीका केली आहे. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असा घणाघात शेलार यांनी विरोधकांवर केला. आशिष शेलार यांनी एक ट्विट केले. मुंबईतील गिरणी कामगारांना कुणी संप करायला लावला? कुणी कामगारांना फसवलं? कुणी कामगारांना उद्ध्वस्त केलं? कुणी मालकांचे फायदे करून दिले? असे सवाल उपस्थित करीत शेलार पुढे म्हणतात की, माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत! शेलार यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्यात झालेल्या कृषी कायद्याबाबत भाष्य केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेतीविषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? काँग्रेसने स्वत: जे केले त्या विरोधातच भारत बंद? काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकर्यांनी बळी पडू नये!, असे आवाहनही शेलार यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper