खोपोली : प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्यामुळे आपघाताच्या घटना वाढत आहेत. चार महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन झाले मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांची भेट घेत ठेकादार आणि अभियत्यांवर विरोधात संताप व्यक्त केला.
ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने चार कोटी 80 लाख रूपयांचा निधी दिला आहे. चार महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने सातत्याने अपघात होत आहेत. पूर्वीपेक्षा आता रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने ताकई ग्रामस्थांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन नगरध्यक्षा सुमन औसरमल यांच्यासमोर संताप व्यक्त केला.
ताकई ग्रामस्थ किशोरभाई पाटील, अॅड. रामदास पाटील, अतुल पाटील, जयवंत पाटील, राकेश पाटील यांनी अक्रामक होत या वेळी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले. व रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास खड्ड्यांमध्येच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.
ताकई गावचे नगरसेवक सुनील पाटीलसुद्धा या वेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काम रखडल्याचा ठपका पाटील त्यांनी प्रशासनावर ठेवला. या वेळी उपनगराध्यक्षा विनीता कांबळे, नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, बांधकाम अभियंता लगाटे उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper