मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सरकार रेस्टॉरंट, बार खुले करीत आहेत, मग मंदिरे का बंद यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येला गेला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुख्मिणीचीही पूजा केली. मग आता मंदिरे सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?, असे प्रश्न कोश्यारींनी उपस्थित केले आहेत. तीन महिन्यांच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी, नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मागणी केली, असेही राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper