चोवीस तासांत 794 रुग्णांच्या मृत्युंमुळे चिंता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (दि. 10) सकाळी संपलेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसास देशात 800 रुग्णांना जीव गमावावा लागला आहे, तर पहिल्यांदाच तब्बल दीड लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, प्रचंड वेगाने संक्रमण होत आहे. दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. गर्दी आणि कोरोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या 24 तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे.
देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल एक लाख 45 हजार 384 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर याच कालावधीत 77 हजार 567 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. 24 तासांत 794 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात 301 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर 1.74 टक्के इतका असून, आतापर्यंत राज्यात 57 हजार 329 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण पाच लाख 34 हजार 603 रुग्ण उपचार घेत आहेत.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण कोरोना रुग्णसंख्या ः एक कोटी 32 लाख 5 हजार 926
एकूण डिस्चार्ज ः एक कोटी 19 लाख 90 हजार 859
एकूण अॅक्टिव्ह केस ः 10 लाख 46 हजार 631
एकूण मृत्यू ः एक लाख 68 हजार 436
एकूण लसीकरण ः 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 डोस
RamPrahar – The Panvel Daily Paper