नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
ईव्हीएमवरून वाद सुरू असल्याने गुरुवारी (दि. 23) मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची शक्यता गृहमंत्रालयाने वर्तविली आहे. त्यामुळेच मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काही व्यक्तींकडून हिंसेला प्रोत्साहन देणारी भडकावू विधाने केली जाण्याची शक्यता असल्याने मतमोजणी केंद्रं आणि ईव्हीएम स्ट्राँगरूमजवळील सुरक्षेत वाढ करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या सूचनादेखील गृहमंत्रालयाकडून देण्यात
आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी संपले. उद्या सकाळी 8 वाजेपासून देशभरात मतमोजणीला सुरुवात होईल. या वेळी काही भागात हिंसाचार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याच्या सूचना गृहमंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
मतमोजणी केंद्रं आणि स्ट्राँगरूमची सुरक्षा वाढवण्याचे आदेश
गृहमंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. काही व्यक्तींकडून चिथावणीखोर विधाने करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळेच गृहमंत्रालयाने ही सूचना केली आहे. ईव्हीएमबद्दल भाष्य करताना माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी भडकावू विधान केले आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यास रक्त सांडेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper