मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. मागच्या काही महिन्यांपासून लोकल, मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर लोकल सेवा सुरु होऊ शकते, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काही निर्णय जाहीर करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण लोकल, मंदिर आणि जीम इतक्यात सुरु होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
मला गर्दी नकोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत इतक्यात तरी लोकल पूर्ण क्षमतेने सुरु होणार नाही. राज्यातंर्गत ट्रेन वाहतूक सुरु केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देऊ असे त्यांनी सांगितले. पण लॉकडाऊनपूर्वी जशी लोकल सेवा सुरु होती, तशी लोकल सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही.
जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ असे ते म्हणाले. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टच पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मंदिर उघडण्याची मागणी होत आहे, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचे प्रेम आहे. तगडयात तगड घालून मंदिर बंद ठेवायची आमची इच्छा नाही. उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper