मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी! महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले! असे शेलार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. राज्यातील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून मंगळवारी संवाद साधला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वरिष्ठ अधिकारी आणि कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. राज्यात सार्वजनिक ठिकाणी करोना नियमांचे कठोरपणे पालन होताना दिसत नाही. गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय योजण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच, आंदोलने, सभा, मिरवणुकांना परवानगी देऊ नये, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांना दिले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper