मुरूड-जंजिरा ः प्रतिनिधी
शनिवारी बुद्धपौर्णिमेची आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी साधून हजारो पर्यटक मुरूड, काशीद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटकांनी स्वतःच्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले. त्यामुळे मुरूडच्या समुद्रकिनारी असणार्या लॉजेसभोवती गाड्यांची गर्दी दिसून आली. मुरूडसह काशीद समुद्रकिनाराही शेकडो पर्यटकांनी फुलून गेला होता.
पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने मासळी मार्केट येथून जंजिरा किल्ला येथे जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी, येथील असणारी वाहनतळे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनेच वाहने दिसून येत होती. राजपुरी येथील अरुंद रस्त्यामुळे मोठी वाहने आल्यास वाहतूक कोंडीचे चित्र पाहावयास मिळत होते.
मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटरवर मुरूड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली तसेच औरंगाबाद, पुणे, बीडचेही पर्यटक सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला व
समुद्रकिनारा पाहण्यासाठी आले होते. मुरूडचे सध्याचे तापमान 36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असूनही पर्यटकांनी येथे येणे पसंत केले. समुद्रस्नान, बनाना रायडिंग, पॅरासिलिंग तसेच काही पर्यटक घोडेस्वारी, उंटसवारीचाही आनंद लुटत होते. शनिवार-रविवारी पर्यटकांच्या लोंढ्यांमुळे सर्व हॉटेल्स, लॉजिंग हाऊसफुल्ल झाले होते.
स्टॉल्स, दुकानांवरही पर्यटकांची मोठी गर्दी दिसत होती. या वाढलेल्या पर्यटकसंख्येबाबत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुरूडचे बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी दिघी, राजपुरी आणि खोरा बंदर येथून पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्यावर धडकले आहेत. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटक आल्याने किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी थोडा वेळ त्यांना बोटीत थांबावे लागत आहे. शिडांच्या बोटीत लाइफ जॅकेट ठेवण्याची सक्ती करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाची काळजी घेण्याच्या सूचना बोटमालकांना देण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट पोहणारेही तैनात करण्यात आले असून, प्रवाशांची काळजी घेण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही या वेळी बारापत्रे यांनी सांगितले.
जंजिरा जलवाहतुकीचे व्यवस्थापक नाझ कादरी यांनी सांगितले की, किल्ल्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अनेक पर्यटकांना किल्ल्यात जाण्यासाठी वेटिंग करावी लागत आहे. वेगवान वार्यामुळे किल्ला परिसरात लाटा थडकत असल्याने होडीतून उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही पर्यटक किल्ल्याला वळसा घालून किनार्याकडे फिरकत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
– वीकेंडमुळे वाहतूक
व्यवस्था कोलमडली
उन्हाळी सुट्या आणि वीकेंडमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मोठ्या संख्येने खासगी वाहने या मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात दत्तवाडी ते अमृतांजन पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासूनच बोरघाटात तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper