उरण ः रामप्रहर वृत्त
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण मुसळधार पावसाने पूर्णपणे भरून वाहू लागल्याने उरणकरांचे पाणी संकट टळले आहे.
जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे धरणाची पातळी आटली होती. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने रानसई धरणाची पातळी 117 फूट ओलांडून धरण वाहू लागल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.
रानसई धरण ओव्हरफुल झाल्याने उरणकरांची पाणीकपात बंद होऊन पाणी संकट टळले आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येनुसार हे धरण अपुरे पडत आहे. तरी धरणाचा गाळ अथवा उंची वाढविणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
– धरण परिसरात मनपाचे सुरक्षा पथक
पनवेल ः वार्ताहरपनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार गाढेश्वर धरण परिसरात सुरक्षा पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. पावसाळ्यात अनेक नागरिक गाढेश्वर धरण परिसरात फिरावयास येतात. अशावेळी काही तरूण-तरुणी हुल्लडबाजी करून स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करतात. यासाठी प्रतिबंधाबरोबर खबरदारी म्हणून जीवरक्षक तैनात केले असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आपत्कालीन विभागाचे अनिल जाधव व सुरक्षा विभागाचे प्रमुख रमेश पाटील यांनी अचानक भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper