नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आपण एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक असून आपल्या प्रत्येक कृतीमधून राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम ही भावना परावर्तीत झाली पाहिजे, असा बहुमोल सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद रायही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. कोरोनाविरोधी लढाईत आपल्या पोलिसांनी देशातील जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. या प्रयत्नात अनेक पोलीस कर्मचार्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आदरांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामन्यांमध्ये असलेली पोलिसांची नकारात्मक छबी पुसणे हे मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात यात काहीशी सुधारणा झाली. त्या वेळी पोलिसांकडून गरीब, गरजूंना मदत केली गेली. तरीही नकारात्मकता कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे ही या दलातील नव्या पिढीची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांत पोलीस दलात मुलींचा समावेश अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या देशाच्या मुली सेवेत दक्षता व उत्तरदायीत्वासोबतच नम्रता, सुलभता आणि संवेदनशीलतेच्या मूल्यांना अधिक सक्षक्त करतात, असेही पंतप्रधान म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper