नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमधील पाटणा शहरात 11 ते 14 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सिन्नर (नाशिक) येथे झालेल्या 66व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून अंतिम संघाची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या सायली केरीपाळेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
अंतिम 12 खेळाडूंमध्ये राज्य अजिंक्यपद विजेते पुणे संघाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे; तर उपविजेते मुंबई उपनगरच्या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई शहर, नाशिक व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक खेळाडू अंतिम 12मध्ये स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार व संघ व्यवस्थापक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा गावंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघ : सायली केरिपाळे (कर्णधार, पुणे), अर्चना करडे (ठाणे), श्रद्धा पवार (रत्नागिरी), दीपिका जोसेफ (पुणे), अंकिता जगताप (पुणे), स्नेहल शिंदे (पुणे), आम्रपाली गलांडे (पुणे), कोमल देवकर (मुंबई उपनगर), सोनाली हेळवी (सातारा), पूजा यादव (मुंबई शहर), ज्योती पवार (नाशिक), सायली नागवेकर (मुंबई उपनगर).
RamPrahar – The Panvel Daily Paper