पन्नास वर्षांपूर्वीचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व माध्यम जग वेगळेच होते. देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती आणि त्यात चित्रपट प्रमाणपत्र संस्थेचे नियम कडक झाले होते. विशेषत: हिंसक दृश्यांवर सेन्सॉरची धारधार कात्री लागत होती. ‘शोले’चा क्लायमॅक्स म्हणूनच बदलावा लागला. ठाकूर बलदेवसिंग (संजीवकुमार) गब्बरसिंगचा (अमजद खान) अतिशय त्वेषाने खातमा करतो असा क्लायमॅक्स बदलून पोलीस गब्बरसिंगला अटक करतात असे दाखवावे लागले.
सत्तरच्या दशकातच समांतर चित्रपट अथवा नवप्रवाहातील चित्रपट यांची चळवळ रुजत होती. त्यांनाही सेन्सॉर कैचीचे भान ठेवावे लागत होते. अशातच सुरुवातीस शांत असलेले ‘शोले’चे वादळ आता घोंघावू लागले होते. सगळीकडेच ‘शोले’चीच चर्चा होऊ लागली होती. मुंबईनंतर देशातील विविध राज्यांत आता टप्प्याटप्प्याने ‘शोले’ प्रदर्शित होत होत सामाजिक सांस्कृतिक वातावरणात उत्साह निर्माण होत होता. त्या काळात अशाच पद्धतीनुसार चित्रपट प्रदर्शित होत. सगळीकडेच थिएटर्सवर हाऊसफुल्लचा फलक मुक्काम करण्यासाठीच लागत होता (तो स्थिर होता) आणि अशातच श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘निशांत’ (मुंबईत रिलीज 5 सप्टेंबर 1975) दाखल झाला. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या गोष्टीचीही आपण दखल घ्यायलाच हवी.
‘शोले’च्या अक्राळविक्राळ लाटेसमोर ‘निशांत’चा निभाव लागणे कठीण. हे भिन्न पठडीतील चित्रपट. पहिला चित्रपट पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक गोष्टीनी भरलेला, वनलाईनर डायलॉगबाजीत प्रभावी ठरलेला, तर दुसरा बौद्धिक समाधान देणारा. हा नवचित्रपट (समांतर/न्यू व्हेव/कलात्मक) पठडीतील बौद्धिक समाधान देणारा चित्रपट होता. दोन्हीचा प्रेक्षकवर्ग भिन्न. प्रसिद्धीचा पोतही वेगळा.
सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपट कूस बदलत होता. अनेक गोष्टींची घुसळण होत होती. एकिकडे धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत थेटरात टाळ्या शिट्यांनी एन्जॉय केले जात होते. चित्रपट पाहणे म्हणजे जणू सेलिब्रेशन आहे असा माहौल होता. आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याची नि ते इतरांना सांगण्यात हौस मौज होती. माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची भूमिका बजावत होती.
दुसरीकडे पहायचे तर मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’ (1970)पासून हिंदीत समांतर चित्रपट रूजू लागला. श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकूर’ने (1973)त्याला मुख्य प्रवाहात आणले. बासू चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ने (1974) स्वच्छ मनोरंजक चित्रपट रुजवला. सतराम रोहरा निर्मित ‘जय संतोषी मा’ (मुंबईत रिलीज 30 मे 1975)ने पौराणिक चित्रपटाची क्रेझ वाढवली. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘अमर अकबर अॅन्थनी’ने (1977) मल्टी स्टार कास्ट चित्रपटाची जणू गरज निर्माण केली. सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी भारीच तेजीत होती. त्याचीच फळे आज मिळताहेत.
यात समांतर चित्रपटाला आपलं अस्तित्व राखणे आवश्यक होते. आणि त्यातीलच एक चित्रपट निशांत. या वास्तववादी चित्रपटाचे सगळे चित्रीकरण हैदराबादजवळील एका गावात झाले. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांची असून संवाद सत्यदेव दुबे यांचे आहेत. या चित्रपटाला वनराज भाटीया यांचे पार्श्वसंगीत आहे (हा चित्रपट गीतविरहित आहे. समांतर चित्रपटात गाणी नसत. प्रसंगानुरूप एकादे नृत्य असे. अपवाद श्याम बेनेगल दिग्दर्शित भूमिका या चित्रपटाचा. त्यात गीत संगीत व नृत्य आहे. मराठीतील अष्टपैलू अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित हा चित्रपट आहे. स्मिता पाटील यांनीही ही अतिशय प्रभावीपणे ही भूमिका साकारली. आजही एखाद्या चित्रपट महोत्सवात निशांत, भूमिका, अंकूर या चित्रपटांचा समावेश होतो हे विशेष. )
‘निशांत’चे कथासूत्र असे… खेड्यातील तीन जमीनदार अण्णा (अमरीश पुरी), अंजैय्या (अनंत नाग), प्रसाद (डॉ. मोहन आगाशे) यांचा काहीसा भाबडा धाकटा भाऊ विश्वम (नसिरुद्दीन शाह) विवाहित असूनही गावातील शिक्षकाच्या (गिरीश कर्नाड) बायको सुशीलावर (शबाना आझमी) कमालीचा फिदा होतो. त्याचे लाड करत करत ते जमीनदार भाऊ त्या सुशीलाचे अपहरण करतात. विश्वम आपल्या पत्नी रुक्मिणीकडे (स्मिता पाटील) फारसे लक्ष देत नसतो. जमीनदार वृत्तीची दहशत, हिंसा आणि ग्रामीण भागातील गरीब स्रीचे शोषण या भोवती हे कथानक आहे. पोलीस पाटील (कुलभूषण खरबंदा) हे प्रकरण हाताळतो ते संशयास्पद ठरते. चित्रपट पाहताना आपण अगदी सुन्न होतो आणि तीच या चित्रपटाची ताकद आहे. देशातील ग्रामीण भागातील एक भयाण वास्तव या चित्रपटात मांडले आहे. पन्नास वर्षांपूर्वीचे ही भयानक स्थिती दुर्दैवाने आजही कायम आहे. असे चित्रपट व त्यावरची चर्चा कायमच त्याकडेच लक्ष वेधून घेतात. संकलक भानूदास दिवकर यांचाही खास उल्लेख हवाच. दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील टोपीवाला लेनमध्ये ते राहत. काही वर्षांनी त्यांच्या भेटीचा योग आला होता.
नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांची भूमिका असलेला हा पहिला चित्रपट. म्हणजेच त्यांच्याही कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील. दोघांनीही समांतर चित्रपटात काम करत मग व्यावसायिक चित्रपटात पाऊल टाकले. समांतर चित्रपटात काम करुन मानाचे पुरस्कार प्राप्त होतील, पण आर्थिक गणितासाठी व्यावसायिक चित्रपटातून भूमिका साकारायला हवी हे वास्तव त्यांनी ओळखले (हे चित्र चांगले नाही, पण या गोष्टीला उत्तर नाही). सामाजिक सांस्कृतिक स्थितीवर ते रोखठोक भाष्य करतात हे विशेष उल्लेखनीय. नसिरुद्दीन शाहने आपले आत्मचरित्र And Then one Day मध्ये आपल्या या पहिल्या चित्रपटासाठीची निवड यापासून बरेच काही लिहिले आहे.
गिरीश कर्नाड यांनी झू स्टोरीमधील काम पाहून श्याम बेनेगल यांना नसिरुद्दीन शाहचे नाव सुचवले. श्याम बेनेगल यांच्या पहिल्या भेटीसाठी नसिरुद्दीन शाह पुण्यावरून (तेव्हा तो पुण्यातील एफटीआयमध्ये होता) पहाटेच बसने निघाला आणि पेडर रोडवरील त्यांच्या घरी लवकरच पोहचला. आपल्याला चित्रपटात काम मिळतेय याचा त्यात त्याचा आनंद होता. (दिल्लीत एनएसडीमध्ये असताना अमेरिकन कल्चरल सेंटरच्या नाट्य महोत्सवातील झू स्टोरी मध्ये नसिरुद्दीन शाहने भूमिका केली होती.) पंचेचाळीस दिवसांच्या चित्रीकरणात ‘निशांत’ पूर्ण झाला. दिवसांची काटकसर म्हणजेच बजेटचीही काटकसर असे गणित त्यात असे. त्याच वेळेस सलग चित्रीकरण करताना आपल्या चित्रपटावर सतत होत असलेल्या गप्पा, वाद विवाद हेदेखील चित्रपटाच्या पथ्यावर पडत असते.
‘निशांत’ आपल्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम कलाकृती असे नसिरुद्दीन शाह मानतो यातच या चित्रपटाचे मोठेपण अधोरेखित होतेय. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने नसिरुद्दीन शाहने आयुष्यात प्रथमच विमानतळ पाहिले आणि मुंबई ते हैदराबाद (आणि रिटर्न) असा पहिल्यांदाच विमान प्रवास केला तेही विशेष रोमांचित होत. ही गोष्ट आज अगदीच साधी वाटते, पण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद खूपच मोठा असतो आणि तो आयुष्यभर मनात राहतो.
चित्रपटात गिरीश कर्नाड, अमरिश पुरी, अनंत नाग, स्मिता पाटील, मोहन आगाशे, कुलभूषण खरबंदा, साधु मेहर, सविता बजाज यांच्याही भूमिका. (या चित्रपटाच्या वेळेस गिरीश घाणेकर श्याम बेनेगल यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते. काही वर्षातच ते प्रेम करूया खुल्लम खुल्ला इत्यादी चित्रपटांनी मराठीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारूपास आले. हा तपशील मराठी चित्रपट रसिकांसाठी खूपच महत्त्वाचा)
चित्रपटाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (1976), लंडन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (1976), मेलबोर्न आणि शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (1977) यात ‘निशांत’ला विशेष गौरविण्यात आले. त्या काळात जगभरातील अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट दाखल होणे विशेष उल्लेखनीय होते. समांतर चित्रपट चळवळीतील ती अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरे. या चळवळीस ती सपोर्ट सिस्टीम ठरे.
ब्लेझ फिल्म एन्टरप्रायझेसच्या वतीने हा चित्रपट निर्माण करण्यात आले. या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात श्याम बेनेगल यांचे कार्यालय ग्रॅन्ड रोड येथील ज्योती स्टुडिओत होते. (जेथे भारतातील पहिला हिंदी बोलपट अर्देशीर इराणी दिग्दर्शित ‘आलम आरा’चे चित्रीकरण झाले. 1931 सालचा हा चित्रपट आहे. आज या स्टुडिओत पूर्वीच्या काळातील फक्त मेकअप रुम्सच्या खाणाखुणा शिल्लक आहेत आणि इतर काही लहान मोठ्या उद्योगासह आजच्या काळातील बॅन्वेट आहे.)
हिंदीतील समांतर चित्रपट चळवळीतील निशांत हा एक उल्लेखनीय चित्रपट. ‘शोले’च्या वादळातही त्याने आपले अस्तित्व दाखवले. कसदार चित्रपट असा आपली जागा निर्माण करीत असतोच. आज जगभरातील अनेक देशांत ‘शोले’चे पन्नास वर्ष सेलिब्रेशन सुरू आहे, चित्रपट महोत्सवात ‘शोले’ दाखवला जातोय, सोशल मीडियावर मोठ्याच प्रमाणावर शोलेवर फोकस टाकला जातोय. त्यात ‘निशांत’चा विसर पडू नये. तोही तितकाच महत्त्वाचा चित्रपट आहे.
– दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper