खराब हवामानाचा फटका
मुरूड : प्रतिनिधी
खराब हवामानामुळे महाराष्ट्रासह परराज्यांतील शेकडो मच्छीमारी होड्या सध्या रायगड जिल्ह्यातील विविध किनार्यांवर विसावल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कधी जोरदार वार्यांचा मारा, तर कधी मुसळधार पावसामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्या कोळी समाजावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी कोकणात आलेल्या रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांसह गुजरात आणि गोव्यातील मच्छीमार नौका रायगडातील बंदरांवर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात मत्स्य व्यवसाय अधिकारी सुरेंद्र गावडे यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की, आगरदांडा बंदरात गुजरात, गोवा व अन्य ठिकाणाहून सुमारे तीनशेपेक्षा जास्त बोटी आसरा घेण्यासाठी थांबल्या आहेत. त्याचप्रमाणे रेवदंडा व रेवस खाडीतसुद्धा असंख्य बोटी स्थिरावल्या आहेत. खराब हवामानामुळे ज्या बोटी किनार्यावर उभ्या आहेत, त्यातील व्यक्तींना औषधे, अन्नपाणी व तत्सम मदत करावी, असे आदेश मत्स्य विभागामार्फत आम्ही मच्छीमार सोसायट्यांना दिले आहेत.