अहमदनगर : प्रतिनिधी
साईबाबा जन्मभूमी वादाबाबत शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये रविवारी (दि. 19) कडकडीत बंद पाळण्यात आला. शिर्डी शहरात ग्रामस्थ व साईभक्तांनी रॅली काढली. दरम्यान, सुटीचा दिवस असल्याने भाविकांची साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली होती, मात्र बाजारपेठ बंद असल्यामुळे साईभक्तांची गैरसोय झाली.
साईबाबा जन्मस्थळाच्या वादातून बेमुदत शिर्डी बंद पुकारण्यात आला. शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला होता. या बंदला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. शिर्डीतील सर्व दुकाने, व्यवहार बंद होते. शिर्डीत सकाळी द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमादेखील काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात ’शिर्डी माझे पंढरपूर’ आरती करून करण्यात आली. या ठिकाणी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. साईचरित्रातील ओव्यांचे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या वेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला, असा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौर्यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper