
मुरूड ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून एसटी चालकांची ड्युटी ठाणे येथे अत्यावश्यक सेवा म्हणून लावण्यात आली आहे. त्यानुसार काही आगारांतील चालक व वाहक ठाणे येथे आपली ड्युटी बजावण्यासही गेले होते, परंतु सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथे कर्तव्य बजावणार्या चालक-वाहकांची राहण्याची व भोजनाची परवड होऊ लागली. परिणामी एसटीचालकांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे पाच-सहा दिवस सेवा बजावल्यानंतर हे सर्व जण त्रासाला कंटाळून परत आले आहेत. अत्यावश्यक सेवा बजावताना भोजनाची सोय ठाणे येथील आगारप्रमुखांनी करणे आवश्यक होते, परंतु ज्याचे भोजन त्यांनीच करावे हे धोरण अवलंबल्यामुळे अत्यावश्यक सेवा देणार्या चालकांची उपासमार होऊ लागली. अखेर काही चालक पळून आल्याचे कळते. चालक म्हणाले की, आम्ही अत्यावश्यक सेवा बजावली, परंतु ठाणे आगारामधून भोजनाची व्यवस्था होत नव्हती. एखादा दानशूर व्यक्ती जेव्हा आगारात येईल तेव्हाच भोजन मिळत असे. चालक काम करण्यास तयार आहेत, परंतु त्यांच्या भोजनाच्या सोयीकडे दुर्लक्ष होते. ठाणे आगार सर्वांत मोठे असताना तेथील कर्मचारी वृंद न वापरता रायगडातील आगारप्रमुखांवर चालक पाठवण्याची सक्ती केली जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper