नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए 300हून अधिक जागा जिंकत पुन्हा सत्तेवर येईल. आमच्या घटकपक्षांच्या जागाही वाढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी आम्हाला बहुमताने सत्ता देण्याचे मन बनवले आहे. 2019ला मोदींविरोधात कोणीही नाही. 2024मध्ये कदाचित एखादा चेहरा मोदींविरोधात समोर येईल, असेही त्यांनी म्हटले.
रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. पाकिस्तानने आधी 26/11 हल्ल्यातील गुन्हेगारांना भारताकडे सोपवले पाहिजे व नंतर चर्चेबाबत बोलावे, असे त्यांनी सुनावले. पुलवामा हल्ल्यानंतर मी देशातील सुरक्षा संस्थांना संपूर्ण सूट दिली होती. अशा स्थितीत देशाच्या आशा-अपेक्षेनुसार काम करायचे असते. एअर स्ट्राइकवेळी माझे संपूर्ण लक्ष त्यावर होते. विग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेवेळी षडयंत्र रचण्यात आले होते. प्रत्येक गोष्टीचे विरोधकांनी राजकारण केले. जे आपल्या पंतप्रधानांवर संशय घेतात त्यांना ओळखले पाहिजे, असे मोदींनी म्हटले.
‘मिशन शक्ती’ची घोषणा केल्यामुळे आचारसंहितेचे भंग केल्याच्या आरोपावर मोदी म्हणाले की, हा आचारसंहितेचा भंग नाही. मी फक्त माहिती दिली. ते माझे कर्तव्य होते. जर याचवेळी दुर्दैवाने एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळली असती, तर मी आचारसंहितेचे कारण पुढे करून जबाबदारी झटकू शकलो नसतो. माझे कर्तव्य होते व ते मी केले, असे त्यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी काँग्रेसवर टीका केली. जो देशाचे नुकसान करेन त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानचे कौतुक करणार्यांना ओळखले पाहिजे. देशासाठी हे धोकादायक आहे. पुलवामा हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारे असमंजस आहेत, असेही ते म्हणाले.
…………………………………………………………
पाकिस्तान मृतदेह मोजतेय आणि इथे काँग्रेस पुरावा मागतेय
ओडिशा : पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे मृतदेह मोजतो आहे आणि ’हे’ एअर स्ट्राइकचा पुरावा मागत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते शुक्रवारी (दि. 29) ओडिशातील कोरापट येथे रॅलीला संबोधित करीत होते. आपल्या भाषणात काँग्रेसचा पंतप्रधान मोदींनी चांगलाच समाचार घेतला. ’एअर स्ट्राइकला एक महिना उलटून गेला आहे. पाकिस्तान अजूनही मृतदेह मोजत बसले आहे आणि काँग्रेस एअर स्ट्राइकचा पुरावा मागते आहे. काँग्रेसने जवानांचा आणि शास्त्रज्ञांचा अपमान केला आहे. गेल्या सात दशकांमध्ये काँग्रेसने गरिबांचा अपमान केला आणि आता ते सैन्याचा दिवसरात्र अपमान करीत आहेत. यांना योग्य उत्तर द्यायलाच हवे,’ असे
मोदी म्हणाले. या वेळी मोदींनी ओडीशातील बिजू जनता दलवरही सडकून टीका केली, ’ओडिशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने असतानाही बीजेडीमुळे या राज्याचा विकास होऊ शकला नाही. चिट फन्ड घोटाळा करणारे ओडिशाचा विकास करू शकतात? खाणमाफियांना मदत करणारे आदिवासींचे हक्क हिरावणारे या राज्याचा विकास करू शकतात का’, असा सवाल मोदींनी उपस्थितांना विचारला. लोकांना मजबूत सरकार हवे की लाचार सरकार हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

RamPrahar – The Panvel Daily Paper