
पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या अकाली निधनाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुःख व्यक्त केले तसेच पनवेलमधील हुतात्मा चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. त्यांच्या निधनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, दर्शन ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, नगरसवेक राजू सोनी, सुमित झुंझारराव तसेच गणेश भगत, रूपेश नागवेकर, उमेश भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राचा दादा हरपला -लोकनेते रामशेठ ठाकूर
सर्वसामान्यांची कदर आणि ओळख असलेले, खर्याला खरे व खोट्याला खोटे ठामपणे सांगणारे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असून महाराष्ट्राचा दादा हरपल्याची भावूक प्रतिक्रिया माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघाताने निधन झाले आणि हे वृत्त कळताच मनाला खूप दुःख झाले. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. आकस्मिक असे संकट महाराष्ट्रावर आले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच दोन तास मी स्तब्धच होतो, काय बोलावे सुचतच नाही. जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि तितक्याच तडफेने काम करणारे असे ते होते. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती हरपला आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.
अजितदादांसोबत माझ्या जास्त वेळ भेटी झाल्या नसल्या तरी जेवढ्या भेटी झाल्यात त्यामध्ये आम्ही एकमेकांच्या मनातील बोलत होतो. त्यामुळे त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे नाते होते. काही महिन्यांपूर्वी ईश्वरपूर येथे एका कार्यक्रमात आमची भेट झाली. व्यासपीठावर आमच्यात दोन-चार मिनिटे चर्चा झाली. त्या कार्यक्रमात बोलताना 12 कोटी जनतेचा उल्लेख करत ते माझ्याविषयी कौतुकाने जाहीरपणे भरभरून बोलले होते, अशी आठवणही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी सांगितली.
अजितदादांचे कार्य अजोड -आमदार प्रशांत ठाकूर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे नेते अशी होती. विमान अपघातात त्यांचे निधन झाले ही बातमी सर्वांसाठी धक्कादायक पद्धतीचे वृत्त आहे. अजितदादांनी केलेले कार्य अजोड आहे. रायगड जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
अजितदादांनी सदैव धडपडणार्या, काम करणार्या माणसाला आधार दिला. विशेषत्वाने रायगड जिल्ह्यावर त्यांचे प्रेम होते. रायगडातील अनेक विकासकामांना त्यांनी पाठबळ दिले. ते पाहता संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आज हळहळत आहे. अजितदादांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर अनेकांना शोक अनावर झाला. त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख झाले आहे आणि यातून त्यांना सावरणे कठीण आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.
RamPrahar – The Panvel Daily Paper