Breaking News

दिग्दर्शक यश चोप्रा चित्रपट क्षेत्रातील एक संस्थाच जणू

माणसाचे यशापयश फक्त आणि फक्त संदर्भातून मोजणे योग्य नसतेच…
एखाद्या चित्रपट कलाकार वा निर्माता व दिग्दर्शकाचे किती चित्रपट सुपरहिट ठरले (आजच्या ग्लोबल युगात त्यांनी किती कोटींचा व्यवसाय केला), त्याचे किती चित्रपट अपयशी ठरले (आर्थिक नुकसानीचे प्रमाण किती? ते कितीही असले/नसले तरी चित्रपट निर्मितीची फॅक्टरी जोरात सुरु आहेच) यावर यशापयश मोजणे म्हणजे फक्त जमाखर्च मांडणे आहे. त्यापलीकडे जाऊन अनेक व्यक्तिमत्व आहेत…
यश चोप्रा हेदेखील तसेच. त्यांचे अफाट कर्तृत्व मोजण्यासाठी कोणताही तराजू, मेजरमेंट, कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर नाही. त्यांच्या दिग्दर्शनातील दोन चित्रपटातील भारी प्रसंग सांगतो, ‘दीवार’ (मुंबईत रिलीज 24 जानेवारी 1975)मधील सर्वाधिक भावपूर्ण प्रसंग तुम्हालाही माहिती आहे. रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही आज दीवार तेवढाच प्रभावी आहे हे उत्कृष्ट कलाकृतीचे उदाहरण आहे. (जानेवारीत दीवारला पन्नास वर्ष पूर्ण होताहेत.)
विजय (अमिताभ बच्चन) आपला धाकटा भाऊ रवी (शशी कपूर) या दोघांमध्ये संवाद सुरू होतो. संवादचे हळूहळू रूपांतर शाब्दिक चकमकीत होतं आणि अशातच विजय रवीला म्हणतो, आज मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बॅन्क बॅलन्स है, गाडी है… क्या है तुम्हारे पास?
मेरे पास मां है…. रवी शांतपणे उत्तर देतो आणि संपूर्ण हाऊसफुल्ल थिएटरमध्ये एक प्रकारची शांतता पसरते. ही एक वेगळ्या प्रकारची दाद असते. (थेटरातील टाळ्या नि शिट्ट्या म्हणजेच दाद असते असे नसते. कधी ती दाद अशी शांतपणेही दिली जाते.)
चित्रपट मशाल (1984) पत्रकार संपादक विनोदकुमार (दिलीपकुमार) एका मध्यरात्री आपल्या आजारी पत्नीला सुधाला (वहिदा रेहमान) डॉक्टरकडे घेऊन जाऊ इच्छितात. सुधाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मूत्रपिंडाचे दुखणे बळावते. तिच्या पोटात प्रचंड वेदना होतात. बेलॉर्ड पिअरच्या रस्त्यावर विनोदकुमार येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक गाडीला हात करुन सांगतोय, विनंती करतोय, अरे थांबा… कोणीतरी थांबा कोई तो रोको… कोणीच थांबायला तयार होत नाही… विनोदकुमारसाठी हा अनुभव अतिशय मन:स्ताप देणारा आणि धक्कादायक, दुर्दैवी असतो. अथक प्रयत्नांनंतरही त्याच्या पत्नीला कोणाच्याही गाडीतून लिफ्ट मिळत नाही आणि त्यातच सुधाचे निधन होते.
दिलीपकुमारच्या कारकिर्दीतील हा एक सर्वोत्तम प्रसंग आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांची ओळख रोमान्सचा बादशहा (प्रेमपटाचा राजा) असली तरी माझ्या मते ते भावनोत्कट (इमोशनल) दृश्यांचे प्रभावी कारागीर आहेत. आणि त्यांच्या दिग्दर्शनातील अनेक चित्रपटांत अशा लहान मोठ्या गोष्टी दिसतात. तीच त्यांची खरी दिग्दर्शनीय ताकद आहे.
अगदी यशजींच्या दिग्दर्शनातील हिंदी चित्रपटातील पहिला मल्टीस्टार कास्ट चित्रपट ’वक्त’ (1965)मध्ये भूकंपामुळे एका कुटुंबाची वाताहत होते. आई वडील व तीन लहान मुले एकमेकांपासून वेगळे होतात, आपलं आयुष्य जगतात, मोठेही होतात आणि अठरा रिळांनंतर ते भेटतात. लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड हाच फॉर्मुला. मांडणी व बांधणी अतिशय प्रभावी आणि त्यात भावनोत्कट दृश्यांची प्रभावी पेरणी. या गोष्टीत सगळ्या प्रकारचा मसालेदार मनोरंजक चित्रपटासाठीचा मसाला असला तरी इमोशनल टच जास्त महत्त्वाचा ठरला.
’इत्तेफाक’ (1969)मध्येही यशजींनी एका खुनाभोवतीचे रहस्यरंजक नाट्य साकारताना त्यात शक्य तेथे इमोशन्सही रुजवल्यात. मग ते राजेश खन्नाच्या व्यक्तिरेखेत असो वा नंदाच्या. हा चित्रपट टर्न आणि ट्विस्टने रंगतो.
’त्रिशूल’ (1978) असो वा ’काला पत्थर’ (1979) यशजींनी पटकथेत सर्व प्रकारच्या गोष्टींत ’एक धागा भावनोत्कटचा’ अगदी प्रभावीपणे साकारल्याचे जाणवते आणि तेच तर महत्त्वाचे असते.
मशाल चित्रपट ’अश्रूंची झाली फुले’ या मराठी नाटकावर बेतलेला, तर ’दिल तो पागल है’ (1997) गीत संगीत व नृत्य यांच्या पार्श्वभूमीवरील प्रेमाचा त्रिकोण. एक प्रकारचा ऑपेरा. यशजींची रेंज अशी जबरदस्त. दिल तो पागल है सव्वीस वर्षांनंतरही तितकाच तजेलदार. ’वीर झारा’साठी (2004) त्यांनी संगीतकार मदन मोहन यांच्या एकेकाळी ध्वनिमुद्रित झालेल्या पण कोणत्याच चित्रपटात वापरल्या न गेलेल्या अशा ’चीजा’ अर्थात गाणी या चित्रपटात समाविष्ट केले. यशजींना चित्रपट संगीताचा कान आणि दृष्टी होती हे त्यांच्या ’आदमी और इन्सान’ (1969), ’कभी कभी’ (1976) अशा अनेक चित्रपटातील अनेक गाण्यांतून ’दिसते.’ (’इत्तेफाक’ मात्र त्यांनी गीतविरहित दिला. या चित्रपटाच्या प्लॉटमध्ये गाण्याला ’स्कोप’ नव्हताच. ’दीवार’मध्ये गाणी आहेत, पण ती चित्रपटाच्या ’क्लास’च्या तुलनेत फिकी. हे कसे घडले?) ‘जोशीला’मधील आर. डी. बर्मनचे संगीत आजही लोकप्रिय. चित्रपट मात्र रंगला नाही. यशजी व देव आनंद एकत्र आलेला हा एकमेव चित्रपट.
यशजींनी ’द पोयट ऑफ लव्ह’ अर्थात रूपेरी प्रेमकाव्याचा जनक अशी इमेज ’सिलसिला’ (1981) वेळी मिळाली. चित्रपटात अमित मल्होत्रा (अमिताभ बच्चन) आणि चांदनीचे (रेखा) यांचे एकमेकांवर बेहद्द प्रेम असतानाच अमितच्या भावाचे (शशी कपूर) अपघातात निधन झाल्याने अमितला भावाच्या पत्नीशी (शोभा) लग्न करावे लागते आणि चांदनीला याचा प्रचंड धक्का बसतो. तीदेखील मग लग्न करते, पण तिचं मन आपल्या पतीत डॉ. व्ही.के. आनंद (संजीवकुमार) गुंतण्याऐवजी अमितकडे धाव घेते… या थीममध्ये भरपूर प्रेम, असोशी, भावनिक नाट्य आहे, पण जास्त ’फोकस’ प्रेम गीतांचे दिलखुलास रूपेरी सादरीकरण, उत्कट प्रेम दृश्य आणि स्वित्झर्लंडचे देखणे सौंदर्य, गुलाबांचे ताटवे यावर पडला आणि यश चोप्रा म्हणजे रोमान्स असे समीकरण जुळले. यशजींनी या इमेजमध्ये न अडकता मशाल, फासले, विजय असे काही चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात प्रेमासह अनेक
गोष्टी होत्या.
’चांदनी’ त्यांच्या मनात बसलेली व्यक्तीरेखा. ’दाग’मध्ये राखीचे तर ’सिलसिला’मध्ये राखीचे नाव चांदनी आहे. ’चांदनी’ या नायिकाप्रधान चित्रपटाची त्यांनी घोषणा करताच रेखा ही भूमिका साकारेल असाच अनेकांचा समज होता. तिला ते शोभलेही असते. त्यांच्या डोळ्यासमोर श्रीदेवी होती. ती चेन्नईत शूटिंग करत असताना यशजी तिकडे गेले आणि त्यांनी श्रीदेवीला अतिशय चांगल्या मानधनात ’चांदनी’साठी साईन केल्याची बातमी मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत पोहचलीदेखील. बोनी कपूरने यात मध्यस्थी केली. यशजींना ’चांदनी’च्या सादरीकरणात जास्त रस होता. तेच त्यांचे व्हिजन होते. त्यांनी अनेक दृश्यात सफेद अथवा लाईट रंगाच्ंया वस्त्रांना दिलेली पसंती श्रीदेवीच्या आईला रूचली नाही, पण यशजींना तोच रंग योग्य वाटले. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांचाच निर्णय योग्य होता हे पडद्यावर दिसले. ’चांदनी’ (1989)चा दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरमधील भव्य दिमाखदार प्रीमियर मला आजही आठवतोय. आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना त्याचे आमंत्रण होते आणि तोपर्यंत दक्षिणेकडील प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटात व इव्हेन्टस मध्ये कलरफुल कपडे परिधान करणार्‍या श्रीने चक्क लाईट अथवा सॉफ्ट रंगाला आपल्या कपड्यात पसंती दिल्याचे दिसले. यशजींच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील व्यक्ती रेखे नुसारची वस्त्रे आणि मग त्याचे त्या कला काराला त्याचे पटलेले महत्व यात अधोरेखित होते. ’सिलसिला’साठी त्यांनी जया बच्चन व रेखा यांना महागड्या शिफॉनच्या साड्यांची भरपूर चंगळ करू दिल्याची चर्चा फार रंगली तशी ’चांदनी’ च्याही वस्त्रांची रंगतदार चर्चा न होता श्रीदेवीच्या अभिनयाची झाली ते उत्तम. कलेचा आस्वाद व आदर व्हावा. दिखाऊपणाचा कशाला?
श्रीला तिच्या कारकिर्दीतील द बेस्ट भूमिका यश चोप्रा यांनी ’लम्हे’त (1991) दिली. तिची ही वेगळीच दुहेरी भूमिका. त्यांच्याच ’डर’ (1993) मध्ये नायकावर (सनी देओल) त्याची पत्नी किरणवर (जुही चावला) एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला असा एक प्रकारचा मानसिक स्वास्थ्य सुटलेला (शाहरूख खान) भारी पडला. याच वर्षीच्या ’परंपरा’मध्ये भूमिका साकारायला मिळाल्याने अश्विनी भावे कमालीची सुखावली. आजही ती त्यावर भरभरून बोलते. अनेक कला कारांना आपण यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात भूमिका साकारावी असे मनोमन वाटत असे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्रच.
यशजींचा शेवटचा चित्रपट जब तक है जान (रिलीज 13 नोव्हेंबर 2012) प्रदर्शित करण्याची तयारी सुरू असतानाच त्यांचे 21 ऑक्टोबर 2012 रोजी निधन झाले. आपल्या या शेवटच्या चित्रपटाच्या गुणवत्तेवर समीक्षक, प्रेक्षक व चित्रपटसृष्टी यांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद ते अनुभवू शकले असते तर फार चांगले झाले असते.
यश चोप्रा यांनी परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत रूजवलेल्या यशराज फिल्म या निर्मिती संस्थेचा आज प्रचंड मोठा वटवृक्ष झाला आहे. ’दाग’ (1973) यशराज फिल्मचा पहिला चित्रपट. यशजी आपले मोठे बंधू बी.आर. चोप्रा यांच्या बी.आर. फिल्म या बॅनरमधून बाहेर पडलेले. तेथे धर्मपुत्र, धुल का फूल इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आता चित्रपती व्ही.शांताराम यांनी यशजींना आपल्या राजकमल स्टुडिओत ऑफिससाठी जागा दिली आणि यशजीनी त्यानंतर आपल्या अनेक चित्रपटांचे मुहूर्त व शूटिंग याच स्टुडिओत केले. कालांतराने त्यांची मुले आदित्य आणि उदय यांनी ओशिवरात आधुनिक तांत्रिक गोष्टींसह भव्य दिमाखदार असा यशराज स्टुडिओ उभारलाय आणि अनेक चित्रपटांची निर्मिती सुरू आहे…
यश चोप्रांचा स्मृतिदिन असं बरेच काही सांगणारा. आज यशराज फिल्म ही एक आघाडीची चित्रपट निर्मिती संस्था झाली आहे. अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरील हा चित्रपट स्टुडिओ नवीन तंत्रज्ञानयुक्त अद्ययावत आहे. येथे अतिशय मोठा सेट लावण्यासाठी प्रचंड मोठा फ्लोअर (चित्रीकरणासाठीची जागा) आहे, अतिशय उत्तम असे मिनी थिएटर आहे (यशराज फिल्म आणि धर्मा प्रॉडक्सन्स निर्मित अनेक चित्रपट आम्हा चित्रपट समीक्षकांना येथेच दाखवले). आधुनिक तंत्रज्ञानयुक्त रेकॉर्डिंग स्टुडिओही आहे.
यश चोप्रा यांनी यशराज फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून दाग (1973) पासून पुढचं पाऊल टाकले आणि मग आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे (1995)पासून देश विदेशातील चित्रपट वितरण आणि पाठोपाठ हा भव्य दिमाखदार स्टुडिओ उभारला हे सगळेच एक वैभव आहे. यश चोप्रा एक व्यक्ती होती, आज एक ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचलेली संस्था आहे. यश चोप्रा यांच्या स्मृतिदिनानिमित्त असा चौफेर फोकस हवाच..!
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

अनुसूचित जाती मोर्चा संवाद मेळावा उत्साहात

सरकार मागासवर्गीय समाजासोबत -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब …

Leave a Reply