मेलबर्न : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेले अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेले 174 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. सात विकेट्स राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.
नाणेफेक जिंकत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट झटपट घेण्यात भारतीय गोलंदाज यशस्वीही झाल्या, पण यानंतर बेथ मुनी आणि अॅश्ले गार्डनरने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. दरम्यान मुनीला माघारी धाडण्यात भारताला यश आले, मात्र गार्डनरने एक बाजू लावून धरत चांगली फटकेबाजी केली. मैदानात चौफेर फटकेबाजी करताना गार्डनरने 93 धावांची धडाकेबाज खेळी केली. या तिच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 173 धावांचा पल्ला गाठला.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघातील महिलांनी चांगली सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. एलिस पेरीने शेफाली वर्माला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. शेफाली वर्मा 49 धावा काढून माघारी परतली. दुसर्या बाजूने स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करीत अर्धशतक झळकाविले. 55 धावांची खेळी करून मंधाना बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Check Also
महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …
RamPrahar – The Panvel Daily Paper