Breaking News

कोरोनामुळे मंदावले उद्योगधंदे

नवी मुंबईसह तळोजातील कंपन्या तोट्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्य शासनाने एमआयडीसीमधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, परंतु मनुष्यबळाची कमतरता व कच्चा माल मिळत नसल्यामुळे उत्पादनक्षमता 50 टक्क्यांवर आहे. उद्योग टिकविताना तारेवरची कसरत होत आहे.

राज्यातील सर्वांत प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास पाच हजार छोटे-मोठे व तळोजामध्ये जवळपास 1622 कारखाने आहेत. तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतरही शासनाने उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, परंतु इतर समस्यांमुळे उद्योगांचे चाक गाळातच रुतत चालले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने इंजिनिअरिंग उद्योग जवळपास ठप्प झाला आहे. कोरोनाच्या भीतीने कामगार गावाकडे गेल्यामुळे पुरेसे मनुष्यबळ नाही. कच्चा माल मिळत नाही. उद्योगांना माल पोहचविणारे व्यवसाय बंद आहेत. या सर्वांचा परिणाम उद्योगांवर होत आहे. लहान उद्योजकांचे कंबरडे मोडत असून, आर्थिक स्थिती खालावत आहे. पूर्णक्षमतेने व्यवसाय सुरू झाले, तरच उद्योग टिकविणे शक्य होणार आहे.

कारखान्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा जवळपास बंद आहे. ऑक्सिजनच मिळत नसल्यामुळे फॅब्रिकेशन व इतर इंजिनिअरिंगची कामे बंद आहेत. जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत कारखानेही सुरू होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये मुुंबई, ठाणे व इतर परिसरातून अनेक कामगार येतात. या कामगारांना रेल्वे व बसने प्रवास करता येत नाही. यामुळे कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचा परिणामही उद्योगांवर होत आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने सुरू आहेत. परंतु कच्चा माल मिळत नाही. मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, असे ठाणे-बेलापूर इंडस्ट्री असोसिएशनचे (टीबीआयए) सचिव एम. एम. ब्रम्हे यांनी सांगितले.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. उद्योग सुरू आहेत. परंतु गॅस, मनुष्यबळ व इतर साहित्याचा पुरवठा होत नसल्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही, असे द मॅसेजिंग इंडस्ट्री असोसिएशनचे (टीएमआयए) अध्यक्ष के. आर. गोपी यांनी सांगितले.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील व्यवसाय सुरू आहेत. परंतु उद्योगांना कच्चा माल व इतर साहित्य पुरविणारे व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. वाहतूक, गॅसपुरवठा व इतर अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे.

-सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

कच्च्यामालाअभावी उत्पादनावर परिणाम

एमआयडीसीमधील कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कारखान्यांना कच्चा माल पुरविणारे व्यवसाय बंद ठेवले आहेत. यामुळे कच्चा माल आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांसाठी लागणारे हार्डवेअर व इतर साहित्यही मिळत नाही. यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply