Breaking News

बुडक्या खाडीमुळे शेतकरी चिंतातूर

उरण पूर्व भागात हातातोंडाशी आलेला घास फुकट जात असल्याने उपासमारीची वेळ; आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडली शेतकर्‍यांनी कैफियत

उरण : रामप्रहर वृत्त

खोपटा तर ते काशेखार मार्गे गोवठणे या संपूर्ण सागरी किनार्‍यावरील समुद्री बांधाना ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे या भागातील पांरांगीखार, ववली भेंडी, रेवचावला आदी खाड्या गेली अनेक वर्षे पिकल्याच नाहीत. यामुळे संपुर्ण खाडी पट्ट्यातील शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनी खायचे काय असा प्रश्न पडला असून या भागातील शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या सर्व बंधार्‍याचा योग्य तो बंदोबस्त करण्याच्या त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत नसल्याची व्यथा त्यांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडली आहे. एकतर आजकालची शेतीच मुळात बिनभरवश्याची झाली आहे, त्यातच पूर्वीसारखी कष्टाळू माणसे राहिली नाहीत त्यातच मजुराकरांनी शेती करावी तर या अशा समुद्री बंधारे फुटी मुळे खारे  पाणी शिरून उरणच्या पुर्व भागातील शेतीची पुरती धूळधाण झालेली असतानाही राज्य सरकार मात्र ढुंकूनही बघायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र उरणच्या पुर्व भागात आहे. या संदर्भात नुकतेच येथील शेतकर्‍यांनी एक सह्यांचे निवेदन उरणचे आमदार महेश बालदी यांना देऊन आपली कैफियत मांडली आहे. समुद्री बांधच शिल्लक राहिलेले नसल्याने उधाणाच्या उधाणाला समुद्राचे खारे पाणी या भागातील हजारो एकर शेतजमिनीत शिरत आहे. आता तर हे खारे पाणी अगदी गावाखात्यात येऊ लागले आहे. त्यामुळे गेली काही वर्षे या भागातील शेतीच पिकत नाही. त्यामुळे भाताचे कोठार असलेल्या या भागातील नागरिक असलेल्या शेतकर्‍यांवर विकतचे तांदूळ खाण्याची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणजे या संपूर्ण समुद्रकिनारी भागातून गोवठणे गावापर्यंत पक्क्या स्वरूपाचा रस्ता करण्याची गरज आहे. या कामाकरिता शासनास्तारावरून निधी मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता सरकारी अधिकार्‍यांकडून या संपूर्ण बंधार्‍यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे. त्यातूनच या प्रश्नाची दाहकता कळणार आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याची शेतकर्‍यांची ओरड आहे. पनवेलच्या केळवणे परिसरातील अंतरा बामदा खाडीपेक्षाही खोपटा ते गोवठणेपर्यंतच्या पारांगी खाडी, काशेखार, रेवचा वला खाडी,  ववलीभेंडी, सोनखार, नवा आगार आदी भागातील शेतजमिनीची धूळधाण झाली असून याबाबत कोणाला दया येताना दिसत नाही. या संपूर्ण किनार्‍यावर ज्या ठिकाणी पुर्वी समुद्री बंधारे होते, त्या बंधार्‍यांनाच पक्क्या स्वरूपाच्या रस्त्यात परिवर्तीत करण्याची गरज आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची गरज आहे तो मागण्यासाठी राज्य सरकार जागे होणार का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आम्ही आमची कैफियत उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडली आहे, असे मत ववली भेंडी खाडीत शेती असलेले शेतकरी यशवंत पाटील यांनी बोलतांना मांडले आहे.

गावापर्यंत पक्क्या स्वरूपाचा रस्ता आवश्यक

उरणच्या पुर्व भागातील बहुतांशी गावकर्‍यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मागील काही दिवसात समुद्रकिनारी असलेल्या काही खाड्यांमधील शेतजमिनी भांडवलदारांनी विकत घेतल्या असून त्या बहुतेकांनी या शेतीचे संरक्षण करणार्‍या बंधार्‍यांकडे मागील काही वर्षांपासून पूर्णतः दुर्लक्ष केले आहे त्यामुळे पूर्वीची खोपटा तर असल्या ठिकाणापासून केवळ काही अंतरावर समुद्री बंधारे शाबूत असले तरीही काशेखार ते नवा आगरमार्गे गोवठणे या भागात मागील अनेक उधानांच्या निमित्ताने बाहेर काठाचं शिल्लक राहिलेला नाही. खोपटा पूल ते खाडी किनारी भागातून गोवठणे गावापर्यंत पक्क्या स्वरूपाचा रस्ता हेच यावरील रामबाण उपाय ठरू शकते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply