मॅनचेस्टर : वृत्तसंस्था
विश्वचषकात भरतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. भुवनेश्वर कुमार हा शिखर धवननंतर विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावं लागलं होतं. मैदान सोडण्यापूर्वी त्याने केवळ 2 षटकं आणि चार चेंडू एवढीच गोलंदाजी केली होती. त्याने 2.4 षटकात आठ धावा दिल्या होत्या. त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने विश्वचषकातील पदार्पणाच्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने इमाम-उल-हकला पायचीत करून माघारी धाडले. अफगाणिस्तान (22 जून) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (27 जून) होणार्या सामन्यासाठी भुवनेश्वर अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेल, तसेच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणार्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे, अशी माहिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. भुवनेश्वरची दुखापत किरकोळ आहे. फूट मार्कवरून पाय घसरल्यामुळे ही दुखापत झाली. सध्याच्या घडीला दुखापत फार गंभीर वाटत नाही. आम्ही त्याला थोडा वेळ देणार आहे. आशा आहे की पुढच्या काही सामन्यांआधी तो फिट होईल. जर नाहीच झाला, तर तीन सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही, असं विराट कोहली म्हणाला.