कोलंबो ः वृत्तसंस्था
श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने भारताने श्रीलंका दौर्यासाठी दुय्यम संघ पाठविल्याने नाराजी व्यक्त केली आहे. हा आमच्या देशाचा अपमान असल्याची टीकाही रणतुंगा याने केली.
एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौर्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौर्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंकेत दाखल झाली आहे. महान फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंका दौर्यावर तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौर्यावर काही प्रमुख खेळाडूंसह दुसर्या फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही ते मान्य केले आणि त्यावरून रणतुंगा याने लंकन क्रिकेट बोर्डावरही टीका केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मालिकेचे आयोजन करण्यास नकार द्यायला हवा होता, असे मत रणतुंगाने व्यक्त केले.
’भारताने त्यांचा सर्वोत्तम संघ इंग्लंड दौर्यावर पाठवला आणि श्रीलंकेसोबत खेळण्यासाठी दुय्यम संघ पाठवला आहे. त्यासाठी मी श्रीलंका बोर्डावरही टीका केली आहे,’ असे रणतुंगा याने सांगितले.
दरम्यान, इंग्लंड दौर्यावर असलेल्या श्रीलंका संघाला ट्वेण्टी-20 मालिकेपाठोपाठ वन डे मालिकेतही सपाटून मार खावा लागला आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …