पनवेल ः प्रतिनिधी
‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’ स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण महापालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये सादर केले. गुरुवारी (दि. 15) झालेल्या या स्पर्धेमध्ये 10 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्य प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’स्पर्धेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 10 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहर स्वच्छतेमध्ये हातभार लावण्याच्या उद्देशाने विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. या वेळी उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उप अभियंता विलास चव्हाण, घनकचरा आरोग्य विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्यासह विविध इंजिनिअरींग कॉलेजचे प्रतिनिधी तसेच अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. पिल्लई इंजिनिअरींग कॉलेजने ‘स्वच्छता हर कदम’ हे स्वच्छतागृहांचे निरीक्षण करणार्या पचे सादरी करण केले. तसेच सरस्वती इंजिनिअरींग कॉलेजने प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कॉटन बॅग वेण्डिंग मशीन आणि प्लास्टिक बाटल्यांचे पुर्नवापर करून पेव्हर ब्लॉक तयार करणे, 3 आर पनवेल टिमने प्लास्टिक आईसी प्लीकेशन सादर केले. अशा विविध प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. येत्या काही दिवसांनंतर भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे. तसेच या विजेत्यांनी तयार केलेले प्रकल्प केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेमध्ये पाठविण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प शहराच्या स्वच्छतेमध्ये तसेच प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यामध्ये उपयोगी पडणार असल्याने येत्या काळात पनवेल महानगरपालिका पनवेल महापालिका कार्यक्षेत्रांमध्ये यातील काही प्रकल्प राबविणार आहे.