Breaking News

सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव समारंभ

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची लाभणार शनिवारी प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोनदिवसीय रौप्य वर्ष महोत्सव साजरा होणार असून यानिमित्ताने शनिवारी (दि. 11) दुपारी 3 वाजता होणार्‍या समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, वर्षा ठाकूर, संजय भगत, राज अलोनी, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, भरत ठाकूर, संजय पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भागुबाई चांगू ठाकूर विधी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य धनश्री कदम, रामशेठ ठाकूर कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रौप्य महोत्सवी समारंभाचे समन्वयक डॉ. डी. एस. नारखेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा सत्कार व महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
पनवेल व सभोवतालच्या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, कौशल्याधारित, व्यवसायाभिमुख तथा मूल्याधिष्ठित शिक्षण स्थानिक पातळीवर प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि जनार्दन भगत यांच्या वैचारिक वारसातून 1992 रोजी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर म्हणजेच 26 सप्टेंबर 1997 रोजी चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व शहरी विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना कमी शुल्कामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण  देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून भारताचा जबाबदार नागरिक बनवणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण, अधिक शुल्क व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे इच्छा असूनही शहरामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण घेणे परवडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेने अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रथम संस्थेने कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रम सुरू केले. त्यानंतर विद्यार्थांच्या मागणीनुसार व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
सन 2006मध्ये पहिल्या नॅक मूल्यांकनामध्ये सीकेटी महाविद्यालयाला  ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. सन 2008-09मध्ये मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज अवॉर्ड देऊन सन्मानित केले. आविष्कार रिसर्च कन्वेन्शन हा मुंबई विद्यापीठाचा संशोधनावर आधारलेला उपक्रम ज्यामध्ये राज्यातील सर्व म्हणजे जवळजवळ 850 महाविद्यालये सहभागी होतात. 2009-10मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात सलग नऊ वर्षे सीकेटी महाविद्यालय चॅम्पियनशिप मिळवत आहे. त्यानंतर 2012-13च्या शैक्षणिक वर्षांमध्ये पुन्हा एकदा महाविद्यालयाला मूल्यांकनामध्ये  ‘अ’ दर्जा  व 2017-18मध्ये ‘अ+’ दर्जा प्राप्त झाला. शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये युजीसीकडून स्वायत्त दर्जा महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.
आजपर्यंत महाविद्यालयाने 15 पदवी, 14 पदव्युत्तर त्याचबरोबर नऊ संशोधन विभाग सुरू केले आहेत. सांस्कृतिक विभागात सीकेटी महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठात कायम दबदबा राहिलेला आहे. दरवर्षी मुंबई विद्यापीठात भरवल्या जाणार्‍या सांस्कृतिक महोत्सवात महाविद्यालय मोठ्या प्रमाणात यश संपादित करीत आलेले आहे. त्याचप्रमाणे एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी आज अभूतपूर्व यश मिळवत आहेत. सलग दोन वेळा नवी दिल्ली येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणार्‍या आरडी परेडसाठी सीकेटी महाविद्यालयाच्या एनसीसीच्या कॅडेट्सची निवड झाली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त संसदेत भाषण करण्यासाठी संपूर्ण भारतातून निवड केलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी प्रिया चौधरी ही सीकेटी महाविद्यालयाची होती. एकूण आपल्या वाटचालीत या महाविद्यालयाने अनेक सन्मान प्राप्त केली आहेत. त्यामुळे रौप्य महोत्सव समारंभाला विशेष महत्त्व आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply