Breaking News

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई-गोवा महामार्गाचे काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 30) केले.
कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 किमी आणि मूल्य 251.96 कोटी) काँक्रीटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 किमी आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 किमी आणि मूल्य 35.99 कोटी) काँक्रीटीकरणासह दुपदरीकरण करणे अशा एकूण 63.900 किमी लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे व सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री. शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, ठेकेदार जे. एम. म्हात्रे, पी. डी. देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबंधी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 2011मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना दिरंगाईस जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत. महामार्गाचे 11 टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. हा महामार्ग कोकणातील 66 पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक होईल व त्यातून व्यवसायास चालना मिळेल.
या वेळी मंत्री गडकरी यांनी 13 हजार कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जेएनपीटी बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 12 तासांपर्यंत कमी करेल. 1,200 कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि 1,146 कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.
जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल असा विश्वास व्यक्त करून मंत्री गडकरी यांनी राज्य सरकारांना सहा-आठ इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरून हे रस्ते किमान 50 वर्षे टिकतील तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल.
भारतात वर्षाला पाच लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी 1.5 लाख प्राणघातक असतात. यामध्ये बरेच जण 18-34 वयोगटातील मृत पावतात. हे त्रासदायक आहे. याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे मंत्री गडकरी म्हणाले. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोलनाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे, असेही ते म्हणाले.
रायगड हा विकासाकडे जाणारा जिल्हा आहे. रायगडातील विविध प्रश्नांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी हे सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करीत असतात. अशाच प्रकारे सर्व खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी मिळून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा. शासन, लोकसहभाग आणि खासगी संस्था अशा एकत्रित गुंतवणुकीतून कोकणातील अनेक विकास कामे होऊ शकतात, असे आवाहन करून येथील जलशक्तीचा वापर करून पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांबच लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्र राज्याने अभ्यास करावा. या पर्यायांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवे. त्यासाठी माझ्याकडूनही सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल. त्यातून आपल्या देशाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या या कोकणचा पर्यटन व औद्योगिक दृष्टीने निश्चितच विकास होईल. यामुळे स्थानिक युवकाला रोजगार मिळेल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी शेवटी व्यक्त केला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजचा रामनवमीचा दिवस आहे आणि या दिवशी एकीकडे सर्वत्र महाराष्ट्रात, देशात भक्तिभावाचा गजर सुरू आहे. अशा वेळेला विकासाचा मंत्र जपत या महाराष्ट्राला उर्जितावस्था आणून देण्यासाठी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसाहेब कार्यरत आहेत. मुंबई ते गोवा या महामार्गाची चर्चा दीर्घकाळ होत राहिली, पण या महामार्गाला आपल्या विकासाशी जोडून या कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आज एकत्रित आलेलो आहोत. या संपूर्ण पनवेल आणि परिसरातील लोकांच्या या रस्त्याच्या बाबतीत सातत्याने विवंचना होत्या, वेगवेगळ्या अपघातांच्या संदर्भातील तक्रारी होत्या या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि विकासाचा एक एक मार्ग आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी गडकरीसाहेबांनी पाऊल उचललेले आहे. पनवेलपासून ते कासूपर्यंत 42 किमी लांब आणि 251 कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामाचा आज या ठिकाणी शुभारंभ झाला. त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने गडकरीसाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
आपल्या रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प गडकरीसाहेबांच्या माध्यमातून मिळाले आहेत. इंदापूरपासून ते पुढे झाराप पात्रादेवीपर्यंतचा रस्ता हा जवळपास काँक्रीटीकरण पूर्ण होत आलेला आहे. रायगडच्या दिशेने जाणारा महाड ते पाचाड या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या या रायगड जिल्ह्यातील माणगावपासून ते दिघी पोर्टपर्यंत जाणारा रस्ता याचेही काँक्रीटीकरण तसेच खालापूरपासून पाली आणि पुढे दिघीपर्यंतचे कनेक्शन या रस्त्यांसाठी नितीन गडकरीसाहेबांनी या ठिकाणी भरभरून असा निधी दिला. त्यामुळे जिल्ह्यातील अर्थकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. ते आपल्याकडे जेएनपीटीच्या रस्त्यांच्या लोकार्पणासाठी आले त्या वेळेला कळंबोली येथील जंक्शनच्या विकासासाठी त्या ठिकाणीसुद्धा साडेआठशे कोटीच्या कामाचा शुभारंभ गडकरीसाहेबांच्या माध्यमातून झाला आहे आणि त्याचबरोबर जेएनपीटीपासून राष्ट्रीय महामार्ग 66 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 याला जोडणार्‍या रस्त्याचेसुद्धा गडकरीसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन झाले. खर्‍या अर्थाने या संपूर्ण परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. आपल्या परिसरातील अनेक दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात होतात, पण सर्विस रोड या नावाची संकल्पना विचारात कोणी घेत नव्हते. गडकरीसाहेबांनी अशा पद्धतीच्या आग्रह धरला. त्यामुळे गावाठिकाणी सर्व्हिस रोड होऊन अनेकांचे जीव वाचले आहेत, असेही ते म्हणाले. आमदार महेश बालदी यांनीही मंत्री गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला
या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे यांची समयोचित भाषणे झाली. सर्वच मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कामाप्रति असलेली निष्ठा सर्वांनीच आदर्श घ्यावा अशी असल्याचे मत व्यक्त करून मुंबई-गोवा महामार्गाचे काम जिद्दीने हाती घेतल्याबाबत त्यांचे आभार व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत 414.68 कोटी किमतीच्या आणि 63.900 किमी लांबीच्या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन डिजिटल पद्धतीने झाले. त्यानंतर या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारी ध्वनीचित्रफित सर्वांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव यांनी व सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार यशवंत घोटकर यांनी मानले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply