Breaking News

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते ही समाजहिताची शिकवण दिवंगत जनार्दन भगतसाहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले.
कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2023चे पारितोषिक वितरण उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक झाले. त्या वेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. तत्पूर्वी, शेलघर येथील भगतसाहेब निवासस्थानी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून शकुंतला रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, प्रा. डी. एन. माने, माजी सरपंच पांडुमामा घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय पाटील, संजय भगत, अजय भगत, वसंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, संजय गोंधळी, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, तेजस कांडपिळे, विकास घरत, प्रदीप घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कल्पना ठाकूर, वृषाली वाघमारे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, दा. चां. कडू, विश्वनाथ कोळी, शरद खारकर, अनंत ठाकूर, जयवंत देशमुख, अनिल देशमुख, हेमंत ठाकूर, रतन भगत, अमृत भगत, सी. एल. ठाकूर, अरुण ठाकूर, श्रीकांत घरत, रवींद्र भगत, किशोर पाटील, व्ही. एन. भोईर, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शिवाजी दुर्गे यांच्यासह भगतसाहेबांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, स्व. जनार्दन भगतसाहेबांनी केलेल्या कार्यामुळे हा परिसर नावाजला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावांचा न्याय निवाडा करीत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्य्र व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना भगतसाहेबांच्या अंत:करणात कायम होती. त्यांची शिक्षणाविषयी असणारी प्रचंड आस्था, तळमळ या इच्छापूर्तीच्या उद्देशाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यांचे काम पुढे सुरूच ठेवणे ही त्यांना श्रद्धांजली आहे, असे सांगतानाच भगतसाहेबांचे शिष्य म्हणून काम करीत राहूया, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
भगतसाहेबांची जयंती 29 फेब्रुवारीला असल्याने लीप वर्षाच्या अनुषंगाने दर चार वर्षांनी येते. त्या वेळी महाराष्ट्र स्तरावर उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणीजनांचा पाच लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचे ठरवले. त्यानुसार पहिला मान थोर विचारवंत स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला गेला. त्याचप्रमाणे पुढेही दर जयंतीला मान्यवरांना गौरविण्यात येणार असून 2028 साली भगतसाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्या वेळी महाराष्ट्र स्तरावरील आणि संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर विविध कार्यक्रम घेणार असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी जाहीर केले तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती तसेच विविध क्षेत्रांतील गुणीजनांचे कौतुक करून अभिनंदन केले.
या वेळी विशेष अतिथी म्हणून प्रा. डी. ए. माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 9 मे रोजी कर्मवीर तीर्थक्षेत्री होणारा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होतो आणि त्या ठिकाणी शरद पवार यांच्याप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेही मानाचे स्थान असते. लोकनेते रामशेठ ठाकूर व आम्ही त्या ठिकाणी ’कमवा व शिका’ योजनेत शिकलो. खडी फोडणे, शेती, पिठाची चक्की चालवणे ही कामे करून आम्ही स्वावलंबी शिक्षण घेतले. कर्मवीर अण्णांच्या शिकवणीनुसार आम्ही त्या ठिकाणी घडलो. अण्णा व भगतसाहेबांची प्रेरणा घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर घडले. त्यांनी फक्त या विभागाकरिता नाही, तर महाराष्ट्रासाठी काम केले आहे म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर संपूर्ण रयतेचे आणि महाराष्ट्राचे आहेत. कर्मवीर अण्णांचा विद्यार्थी लोकसभेत मानाने विराजमान झाला हे त्यांच्या कार्याचा विजय असून सामान्यातील माणसाच्या मनात रामशेठ ठाकूर यांनी घर केले आहे. मानवतावादी भूमिकेतून माणूस जोडणारे आणि माणुसकीचे नाते असलेले रामशेठ ठाकूर आहेत. त्यामुळे मोखाड्यात महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे प्रा. माने यांनी नमूद केले. भगतसाहेब भगवंताची मूर्ती होती. संत गाडगेबाबांच्या विचारांचे ते पाईक होते. स्वच्छता हा त्यांचा मंत्र होता त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी वाटचाल सुरू असून इतिहासात नोंद होणारा हा ऐतिहासिक सोहळा असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

भगतसाहेबांच्या निधनानंतर त्यांचा पुतळा उभारावा असे सर्वांच्या मनात आले, पण त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार जनार्दन भगतसाहेबांच्या नावाने शैक्षणिक संस्था उभारण्याचा निर्णय घेतला. भगतसाहेबांच्या मरणोत्तर त्यांच्या नावाने उभारलेली संस्था या विभागाला मिळालेला पुरस्कार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्था पुढे नेत दर्जेदार केली असून रामशेठ ठाकूर यांच्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत.
-जे. एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष

भगतसाहेबांचे कार्य अजरामर आहे. ते अष्टपैलू नेतृत्व होते. आर्थिक आणि शारीरिक शक्तीपेक्षा सामाजिक हित त्यांना महत्त्वाचे होते. त्यांनी कधीही आराम केला नाही. त्यांचे कार्य एवढे अफाट आणि प्रेरणादायी होते की, ते आपल्या समवेतच आहेत असे वाटते. त्यामुळे त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांचे जावई लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हातून ते पूर्ण करून घेत आहेत.
-वाय. टी. देशमुख, उपकार्याध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था

कर्मवीर पुण्यतिथीप्रमाणे आजचा हा दिमाखदार सोहळा आहे. संस्थेचे छोटेसे रोपटे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे वटवृक्षात रूपांतरित झाले. दर्जेदार शिक्षण देण्याचे काम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था करीत आहे. कामानिमित्त इंग्लंड गेलो असताना त्या ठिकाणच्या मॅगझिनमध्ये या संस्थेचा उत्कृष्ट संस्था असल्याचा उल्लेख पहायला मिळाला. त्यामुळे या संस्थेची फक्त भारतात नाही, तर जगभर ख्याती पसरली असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यांनी ‘रयत’ला भरभरून दिले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला दर्जेदार केले. त्यामुळे भगतसाहेबांचा वारसा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जपण्याचे काम केले आहे. भगतसाहेबांचे रामशेठ ठाकूर, जे. एम. म्हात्रे व इतर मंडळी अनुयायी आहेत. त्याचप्रमाणे आम्ही रामशेठ ठाकूर यांचे अनुयायी आहोत. रामशेठ ठाकूर यांनी आम्हाला पाठबळ दिले. मला त्यांच्यामुळे बळ मिळाले. त्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. लोकनेते रामशेठ ठाकूर दानाचा महासागर आहेत. त्यामुळे त्यांचे दातृत्व सर्वांनी स्वीकारले पाहिजे.
-महेंद्र घरत, अध्यक्ष, रायगड जिल्हा काँग्रेस

स्वच्छतेचे महत्त्व जनार्दन भगतसाहेबांनी जाणले होते. शिक्षण आणि स्वच्छता भगतसाहेबांचा पिंड राहिला. भगतसाहेबांवर 84 गावांचा न्याय निवाडा करण्याची जबाबदारी होती आणि ते समाज भूमिकेतून योग्यरीत्या पार पाडायच.े म्हणूच कोणावरही कधीही अन्याय झाला नाही. भगतसाहेबांनी शांतीदूत म्हणून काम केले. भगतसाहेब नसते तर विकासाच्या दृष्टिकोनातून विभाग मागे पडला असता. त्यांच्या नावाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उभारलेल्या संस्थेने जगभरात नावलौकिक मिळवला असून भगतसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून होत आहे.
-अरुणशेठ भगत, अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था

स्वच्छतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजची आणि उद्याचीही स्वच्छता गरज आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी भगतसाहेबांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
-परेश ठाकूर, सचिव, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ

लहानग्यांनी व्यक्त केले मनोगत

या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नातू आदेश परेश ठाकूर आणि आदित्य परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या कार्याचा उजाळा आपल्या मनोगतातून मांडला. भगतसाहेबांचे योगदान, कामगार व त्यांचा संप, स्वच्छता, आवड निवड, समाजसेवेचे प्रेम, समाजहित, समाजसेवेचा छंद असे भगतसाहेबांचे अनेक पैलू विस्तृत आणि ओघवत्या शैलीत त्यांनी मांडले. त्याचबरोबर विद्यार्थी मनोगतात सायली औटे व श्रवण कदम यांनी ओजस्वी भाषणातून भगतसाहेबांचे जीवन विशद केले. या वेळी सत्कारमूर्ती शाहू इन्स्टिट्यूटचे प्रमुख जयंत भगत यांनी सत्काराला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.

यांचा झाला गौरव

स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2023 पारितोषिक
प्रथम क्रमांक : शिवकर ग्रामपंचायत- 01 लाख रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : कुंडेवहाळ ग्रामपंचायत 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : सावळे ग्रामपंचायत 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ : वलप आणि चिंध्रण ग्रामपंचायत – प्रत्येकी 11 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह

शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव

  • भारत सरकारतर्फे स्वच्छ शाळा सन्मानित रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर (पुरस्कार स्वरुप-शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
  • नॅकची ए+ ग्रेड प्राप्त व ऑटोनॉमस उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून राज्यस्तरीय 14वा आणि देशपातळीवर 28वा क्रमांक पटकाविणारे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय (पुरस्कार स्वरूप-शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
  • राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार पटकावणारे भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी (पुरस्कार स्वरुप-शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
  • आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष (पुरस्कार स्वरुप-51 हजार रुपये)
  • गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड जलतरणपटू प्रभात कोळी (पुरस्कार स्वरुप 51 हजार रुपये)
  • शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पनवेल (पुरस्कार स्वरुप -शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली राजपथ येथे परेड करण्यासाठी निवड झालेले ओमकार कैलास देशमुख व प्रांजली दिलीप चव्हाण (पुरस्कार स्वरुप -प्रत्येकी 11 हजार रुपये)
  • चित्रकार गिरीश पाटील (पुरस्कार स्वरुप-51 हजार रुपये)
  • साईशा मंगेश राऊत-यंगेस्ट इंडियन गर्ल टू स्केल माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (पुरस्कार स्वरुप – 25 हजार रुपये)
  • राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणारे श्रीश किरण म्हात्रे आणि विशाल अरुणा तायडे (पुरस्कार स्वरुप-शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply