Breaking News

महाराष्ट्र होणार चूल-धूरमुक्त राज्य शासनाकडून मिळणार गॅसजोडण्या

मुंबई ः प्रतिनिधी

चूलमुक्त-धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅसजोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 23) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 अंतर्गत लाभ न मिळू शकलेल्या नागरिकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 यांच्यासाठी असलेल्या निकषांमध्ये पात्र न ठरणार्‍या शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे,  मात्र अशी कुटुंबे अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील राज्य शासनाच्या शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.  ही गॅसजोडणी कुटुंबप्रमुख प्रौढ स्त्रीच्या नावाने मंजूर करण्यात येणार आहे.  एक शिधापत्रिकाधारक कुटुंब एकगॅस जोडणी मिळण्यास पात्र राहील. प्रत्येकी एक गॅसजोडणी वितरित करण्यासाठी प्रतिजोडणी याप्रमाणे लागणार्‍या 3846 रुपये खर्चाचा भार शासन उचलणार आहे. त्यासाठी 100 कोटी इतक्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात सध्या 41 लाखांहून अधिक कुटुंबांकडे गॅसजोडणी नाही.  यातील बहुतांशी कुटुंबांना यंदाच्या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी दिली जाणार आहे. उर्वरित कुटुंबातील राज्याच्या या योजनेतून गॅस जोडण्यात येऊन 31 मार्च 2020पर्यंत महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना गॅसजोडणी देऊन चूलमुक्त-धूरमुक्त महाराष्ट्र साकारण्याचा शासनाचा निर्धार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply