Breaking News

मनोरंजनाचे एकमेवाद्वितीय साधन : रेडिओ

लहानपणी विविध भारती, बिनाका गीतमाला व आजच्या पिढीला विविध एफएम स्टेशन्सद्वारे मनोरंजन करणारा एकमेव अद्वितीय-रेडिओ. 13 फेब्रुवारी 1946मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा उपलब्ध करून प्रदान करणे, तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे. आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते, पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घड्याळासारखा जास्त व्हायचा. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता…वाजले किती बघा… कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला.. अजून भात व्हायचाय.. असे आवाज स्वयंपाकघरातून यायचे. वनिता मंडळ सुरू झालं की पेपर किंवा एखादं मासिक घेऊन घरातली गृहिणी जराशी कलंडत असे. मग संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने ‘परवचा’, रात्रीच्या ‘आपली आवड’च्या संगतीने डोळे मिटायचे.

जरा जास्त शौकीन असलेला माणूस रेडिओ सिलोन, बिनाका गीतमाला, विविध भारती वगैरे सापडतंय का हे खुंट्या पिळून पाहत असत. तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच बनविले जात की काय कोण जाणे, पण तरीही तो ऐकायचा. कारण रेडिओ टाइम कळला पाहिजे. मग दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्र पाहायला मिळत असताना नुसता आवाज कोण ऐकणार, पण आता एफएमच्या आगमनानंतर रेडिओला जरासा प्राणवायू मिळाला आहे. रेडिओचा शोध 1885 साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते, मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदिशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात 1884 साली केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली रेडिओ क्लब येथे झाली.

1935च्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने, चोरून पत्रके छापणे आणि वाटणे याच्यासोबत चोरटे रेडिओ केंद्र चालवणे हाही एक महत्त्वाचा भाग होता. 1942च्या चले जाव चळवळीच्या वेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीन महिने चोरटे रेडिओ केंद्र चालविले होते. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने मुंबई व कोलकात्यातील दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले. 1936 साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ नाव मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. ‘हवामहल’, ‘सितारों की महफिल’ एकाहून एक सरस गाणी, कार्यक्रम, शास्त्रीय संगीत यामुळे ‘आकाशवाणी’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. 1982 साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला. रेडिओतील बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले. सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमातून हे रेडिओ सेट तयार केले जात असत. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. बॅकलाइट म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या प्लास्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्याचा वापर होऊ लागला. 1950नंतर प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली. 1954 साली लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. हे ट्रान्झिस्टर फारच महाग असत. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहानमोठे रेडिओ तयार होत गेले. लहान आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले. त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले. चिनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. 1977 साली भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमांचे प्रसारण करीत आहेत. खासगी एफएम वाहिन्यांची सुरुवात 1977 साली मद्रासपासून झाली. त्यानंतर गोवा राज्यात काही खासगी रेडिओ वाहिन्यांना परवाने मिळाले. सध्या भारतातील 72 शहरांमध्ये खासगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत. भारतात रेडिओ स्टेशन्स दोन पातळ्यांवर चालतात. आकाशवाणीकडे मनोरंजन कार्यक्रम व वृत्तविषयक कार्यक्रम असे दोन भाग आहेत, तर खासगी वाहिन्या केवळ मनोरंजनाचेच कार्यक्रम प्रसारित करतात. त्यांना सरकारने अद्याप बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले नाहीत. त्यांना केवळ आकाशवाणीच्या बातम्या पुन:प्रसारित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आकाशवाणीच्या एफएम रेन्बो व गोल्ड या माध्यमातून प्रसारण केले जाते. आकाशवाणीचा वृत्तविभाग हा बातम्यांच्या क्षेत्रातील अग्रेसर विभाग समजण्यात येतो. बातम्यांची सत्यता हे त्यांचे शक्तिस्थळ बनून राहिले आहे. आकाशवाणीच्या मनोरंजनाचा भर हा अधिक प्रमाणात केवळ गाण्यांवर असतो. तरीही श्रुतिका, नभोनाट्य, विविध चर्चा, क्रीडाविषयक कार्यक्रम, धावते समालोचन याद्वारेही श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते.

फोन इनसारख्या कार्यक्रमांमुळे आता श्रोत्यांचा सहभागही वाढला आहे. खासगी वाहिन्याही गीतांबरोबरच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातही शहरातील ट्रॅफिकची माहिती देणे, काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्याविषयीची माहिती देणे अशा माध्यमातून ते आपला व्यवसाय जपत असलेले दिसतात. महाराष्ट्रात मुंबई-पुण्याबरोबरच इतर ठिकाणी खासगी वाहिन्या चांगलीच लोकप्रियता मिळवत आहेत. स्थानिक कार्यक्रम व त्या त्या भागात वापरण्यात येणार्‍या विविध उत्पादनांसाठीच्या जाहिराती, शेतीविषयक उत्पादनांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. आजही रेडिओ हे प्रभावी माध्यम समजले जाते.

(जागतिक रेडिओ दिनानिमित्त विशेष लेख)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply