अलिबाग ः प्रतिनिधी
सध्या रायगड जिल्ह्यात 60 गावे आणि 203 पाडे अशा 263 ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी विंधन विहिरी खोदण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 107 विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत.
जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी विनाविलंब टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारितील अपूर्ण कामेदेखील तातडीने पूर्ण करा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या कामांना आत वेग आला आहे. रायगड जिल्ह्यात 227 विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 107 विंधन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. 16 गावे आणि 47 वाड्यांत नवीन विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. 27 गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती झाली आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे केले जात आहेत.
20 मेपर्यंत 200 विंधन विहिरी पूर्ण केल्या जातील. त्यावर हातपंपदेखील बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली.
ज्या जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत, त्यांना अंतिम रूप देऊन शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार नव्याने निविदा काढून जुन्या योजनांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.