उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उरणमधील ग्रामीण भागात स्थानिक शेतकर्यांनी पिकविलेल्या भाजी खरेदीकडे नागरीकांचा कल वाढला आहे. त्यामुळे स्थानिक छोट्या शेतकर्यांच्या मालाची विक्री वाढली असून चांगला भावही मिळत आहे. त्यामुळे गावातील माणूस गावात राहत असल्याकारणाने कोरोना फैलाव होण्यासही
ब्रेक लागत आहे.
कोरोनाचा हाहाकार आणि लॉकडाऊन यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यात शहरातील होलसेल भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रसार होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. विविध भागातून येणारे भाजी विक्रेते व खरेदीदार यामूळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. उरणमध्ये येणारी भाजी ही नवी मुंबई व पनवेलमधील भाजी मंडईमधून येत असते आणि आज दोन्ही ठिकाणी कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामूळे अशा भाज्या खरेदी करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावागावात भाज्यांची लागवड करणार्या स्थानिक शेतकर्यांकडून भाजी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे.
आज ग्रामीण भागात लहान प्रमाणात भाजी पिकविणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे टोमॅटो कोथिंबीर, मेथी, वांगी, शिराळा, कारली, दूधी, मिरची, पडवळ, मिर्ची, काकडी, कलिंगड, पालक, माठ अशा विविध प्रकारच्या भाज्या मिळत आहेत. त्याही चांगल्या पाण्यावर सुपिक जमिनीत पोषण झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनाही चांगल्या भाज्या मिळत आहेत, स्थानिक शेतकर्यांच्या मालालाही भाव मिळत आहे व कोरोना संक्रमणाचा फैलाव होण्यापासूनही बचाव होत आहे.
आम्ही छोट्या प्रमाणात भाजी लावतो व गावात विकतो. पहिल्यांदा ती संपण्यासाठी बाजारात एक तास बसायला लागायचे पण लॉकडाऊनमुळे भाजी लवकर संपत आहे.
– अनिता पाटील, शेतकरी, नागाव, उरण
आता शहरातील बाजारातून येणारी भाजी खरेदी करण्यात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे गावातील स्थानिक शेतकर्यांनी पिकविलेली भाजी घेणे कधीही उत्तम, ताजी व चवीला चांगली पण असते व स्वस्तही मिळत आहे. मी अगोदरही स्थानिक भाजीला पसंती देत होते. आता नागरिक त्याचे अनुकरण करीत आहेत.ताजी भाजी घेण्यास खूप गर्दी असते.
– सोनिया दिलीप घरत, ग्राहक महिला