दुकानांना पाच तासांची मुभा
अलिबाग : प्रतिनिधी
पनवेलपाठोपाठ उर्वरित रायगड जिल्ह्यातही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित वेळेपुरती सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत किराणा मालासह, फळे, भाजीपाला, चिकन, मटण, मासे यांची दुकाने सुरू ठेवण्यास मनाई होती, तर या सर्व वस्तूंची घरपोच सेवा देण्यात परवानगी होती. तथापि ही दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी नागरिकांकडून तसेच व्यापार्यांकडून होऊ लागली. दुसरीकडे गटारीनिमित्त चिकन, मटण विक्रीची दुकाने रविवारी सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मांसविक्रेत्यांनी केली होती. या मागणीची दखल घेत ही सर्व दुकाने लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पनवेलप्रमाणेच रायगडच्या उर्वरित भागात लॉकडाऊनमधून काही अंशी शिथिलता मिळाल्याने नागरिक आणि व्यापार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.