अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील रेवस येथे सुरू असलेल्या रो रो जेट्टीच्या कामामध्ये रविवारी (दि. 24) संध्याकाळच्या सुमारास अपघात झाला. यात एक कामगार जखमी झाला. त्याला अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागला जाण्यासाठी उरणमधील नागरिकांना रस्ता मार्गाने 40 किलोमीटर तर छोट्या होडीतून (जलमार्गाने) धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अलिबाग येथे ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे इंधन व वेळेची बचत व्हावी तसेच अलिबाग व उरणमधील अंतर कमी व्हावे, यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने या दोन बंदराच्या दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रेवस बंदरात जेट्टी बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम सुमारे 25 कोटींचे असून, ते एमईसी कन्सलटंट करीत आहे. हे काम सुरू असताना पाण्यातील फिरता प्लॅटफॉर्म सरकल्याने रविवारी संध्याकाळी अपघात झाला. काम पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.