पाली : प्रतिनिधी
अवैद्य वाळू उत्खननाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी (दि. 9) रात्री सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामस्थांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. राबगाव हद्दीतील अंबा नदीमधून अवैध व अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननाविरोधात यशवंत भोईर, दिलीप मोरे, अनिल भोईर, भिमाजी भोईर, विठोबा तांबेकर आदी ग्रामस्थ सोमवार (दि. 8) पासून पाली तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसले होते. वाळू उत्खननकर्त्याने राबगावमधील काही ग्रामस्थांना मारहाणदेखील केली होती. त्याविरोधात पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर व्यक्तीवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात यावी, ही मागणीदेखील उपोषणकर्त्यांनी केली होती. तहसीलदार दिलीप रायन्नावर व पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी राबगाव उपोषणकर्त्यांची भेट घेतली व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण मंगळवारी रात्री स्थगित केले.