Breaking News

वसुंधरा निरोगी अन् दीर्घायुषी व्हावी!

दरवर्षी 22 एप्रिल हा वसुंधरा डे (पृथ्वी) दिवस म्हणून साजरा करतो. पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने 22 एप्रिल इ. स. 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेल्या डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ. स. 1990 साली 141 देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने 175 देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ. स. 2009 साली संयुक्त राष्ट्रांनी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. पृथ्वीचा जन्म कसा झाला ह्या बद्दल आपण बरेच काही ऐकले आहे. एक आगेचा तापता गोळा होता तो सतत फिरत होता. तो फिरता फिरता त्याचे काही गोळे अलग झाले. त्यापैकी एक गोळा थंड होऊन त्याची पृथ्वी निर्माण झाली कालांतराने त्यावर जीव सृष्टी निर्माण झाली. पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हणतात. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी. 4.54 बिलियन वर्ष पृथ्वी जन्माला झाली. तिचे आयुष्य 7.5 बिलियन वर्ष आहे. म्हणजे जवळपास अर्धे आयुष्य तिचे संपले आहे व अर्धे बाकी आहे. मार्च 2020 पासून संपूर्ण विश्वात कोरोनाने थैमान घातलेले आहे. ह्या विषाणूने संपूर्ण विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे मागची पिढी ही पुढच्या पिढीला काही देणे लागत असते. येणार्‍या पिढीचे जीवन सुरक्षित करण्यासाठी ती झगडत असते. तसे मानवाने निसर्गाचा अतोनात ह्रास केला आहे. वृक्ष तोडी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे आपल्याला आता प्राणवायूची कमतरता जाणवत आहे व त्याची किंमत सुद्धा कळली आहे. हल्लीच एका मुलाचे चित्र व्हॉटसअप व्हायरल होत आहे. हा मुलगा पाठीवर प्राणवायूचे सिलिंडर घेऊन झाड लावत आहे. किती बोलके चित्र व हा संदेश आहे. आज कोरोनाच्या भयंकर महामारीत माणूस प्राणवायू मिळवण्यासाठी जीवाचे रान करतो आहे. पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे. वातानुकूलित संयंत्राची वारंवार गरज भासत आहे. ह्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत आहे. निसर्गात मानव दिवसेंदिवस कचर्‍याची वाढ करीत आहे. समुद्र, नद्या व तलाव प्रदूषित झालेले आहे. ह्यात ई-कचर्‍याची वाढ झाली आहे. नदीच्या पात्रात रेतीचा उपसा, खाडीमध्ये भरती व त्यावरती मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत. ह्यामुळे निसर्ग संवर्धनाला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. स्वच्छ, निरोगी पाण्यासाठी मानव जीवाचे रान करीत आहे. शेती नष्ट होऊन मोठमोठ्या इमारती व महामार्ग तयार झाले आहेत. ह्याचा नक्कीच दुष्परिणाम मानवाच्या व पृथ्वीच्या स्वास्थावर झाला आहे. पृश्वीच्या गर्भातून अमूल्य ठेव्याचा खूप मोठा उपसा हा सुरूच आहे. ह्यात कोळसा, पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल व गॅसचा समावेश आहे. ह्या नैसर्गिक बहुमूल्य ठेव्यावर माणसाचे जीवन निर्भर झाले आहे. पृथ्वीच्या तापमानात अतोनात वाढ झालेली आहे. ह्यावर उपाय करणे फार गरजेचे आहे. पुढच्या पिढीचे आपण देणे लागतो ह्या अनुशंगाने सर्वजण सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. ह्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, मोटारगाडीचा वापर कमी करणे, सायकलचा वापर वाढविणे, इतर व ई-कचरा कमी करणे, झालेल्या कचर्‍याची योग्य ती विल्हेवाट लावणे आदी जर प्रयत्न आपण केले, तर नक्कीच आपले, पृथ्वीचे व येणार्‍या पिढीचे जीवन सुकर होईल. वाढदिवसाला भेटवस्तू देण्याची आपली प्रथा आहे. या वर्षीचा थीम रिस्टोर अवर अर्थ आहे. पृथ्वी कशी रिस्टोर होईल ही भेट आपल्याला पृश्वीच्या वाढदिवसानिमित्त द्यायची आहे. अर्थात ही भेट शेवटी आपली आपल्यालाच मिळणार आहे. या 22 एप्रिलला रिस्टोर अर्थ हा संकल्प करूया व वसुंधरेच्या निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊया! यासाठी ‘अर्थ’ला अर्थ आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

-अरविंद मोरे, नवीन पनवेल, (मो. 9423125251)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply