माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीकडे गांभीर्याने लक्ष देत नगरपंचायत हद्दीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येऊन 29 जून ते 3 जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या जनता कर्फ्यूला सलग चौथ्या दिवशी गुरुवारी नागरिक आणि व्यापार्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी माणगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद व पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते.
माणगावात मागील 15 दिवसांपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण सरकारी कार्यालयातून तसेच घरातून आढळू लागल्याने शहरवासीयांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी खबरदारी म्हणून माणगावकरांनी एकत्र येत जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. रुग्णालय व औषधांची दुकाने दिवसभर तसेच सकाळी 6 ते 9 या वेळेत केवळ परवानाधारक दूध डेअरीची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मागील चार दिवस माणगावकर नागरिक आणि व्यापार्यांनी प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. असेच सहकार्य यापुढेही कायम ठेवा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.