नवी मुंबई ः बातमीदार
महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे एक असे स्मारक आहे, जिथे डोके टेकवण्याची नाही तर डोके चालवण्याची प्रेरणा मिळते, अशा शब्दांत लेखक अरविंद जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई महापालिकेच्या जागर 2022 उपक्रमांतर्गत त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयास अनुसरून प्रबोधनात्मक सुसंवाद साधला. काही माणसे बोलण्यापेक्षा आपल्या कामामधून मार्गदर्शन करतात, असे सांगत त्यांनी विविध ठिकाणी छोट्या-छोट्या गोष्टीतून समाजकार्य करणार्या साध्या माणसांच्या गोष्टी सांगितल्या. या साध्या गोष्टीच डोंगराएवढ्या होतात, असे स्पष्ट केले. अशा प्रामाणिक माणसांच्या भरवशावर हा देश चालतो, असे सांगत त्यांनी देशात बदल घडवून आणण्यासाठी माणूस म्हणून एकत्र यावे, असे मत व्यक्त केले. नवी मुंबई महापालिका डॉ. बाबासाहेबांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने विचारांच्या जागरातून साजरी करीत असल्याबद्दल अरविंद जगताप यांनी विशेष कौतुक केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper