पाली : प्रतिनिधी
अष्टविनायकाचे क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदाररुपी बल्लाळेश्वर कुणाला पावणार याबाबत आता सार्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून, चार ओबीसी प्रभागाची निवडणूक आता 18 जानेवारीला होणार आहे. पहिल्याच निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी करुन निवडणुकीस सामोरे गेलेले आहेत. शेकाप 6 तर राष्ट्रवादीचे 7 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप व आरपीआय स्वतंत्रपणे निवडणुक लढवित आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रचार रॅली काढून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. नगरपंचायतीमुळे पालीच्या विकासाला आता खर्या अर्थाने चालना मिळणार आहे. त्यामुळे मतदार कुणाच्या बाजुने झुकतो हे निकालांती स्पष्ट होणार आहे. पालीत 17 प्रभागात एकूण मतदार संख्या 8500 आहेत. पालीचा सर्वांगीण विकास करून स्वच्छ, सुंदर व समस्यामुक्त शहर करायचे असेल तर मतदारांनाही डोळसपणे आपला अधिकार बजावावा लागणार आहे.