Breaking News

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 10) खारघर येथे पत्रकार परिषदेत मोदी सरकार तसेच विशेषत्वाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कॅन्सर निष्पन्न झालेल्या अनेक लोकांसाठी टाटा हॉस्पिटल हे परवडणार्‍या दरात उपचार देणारे मुंबई परिसरातील आधाराचे ठिकाण आहे, मात्र येथे देशभरातून येणारे रुग्ण आणि त्यांची प्रतीक्षा यादी यामुळे तातडीने उपचाराला विलंब लागत होता आणि त्यामुळे अनेकांचे जीव जात होते. खासगी ठिकाणी उपचार करण्यासाठी एकतर कर्ज काढावे लागते. नाहीतर अनेकांना संपत्ती विकून महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अनेक परिवार दुःखाच्या छायेत वावरतात. आता या निर्णयामुळे रुग्णाच्या उपचाराची प्रतीक्षा यादी ही जवळपास संपणार असून वेळेत उपचार होऊन अनेक रुग्णांचे जीव वाचणार आहेत. यामुळे अनेक परिवारांना दिलासा मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने हा निर्णय लाखो परिवारांना दिलासा देणारा ठरणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही; तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रुग्णालयातील रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे संवाद साधत पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने टाटा हॉस्पिटलमधील मनुष्यबळाची संख्या तब्बल 2405, तर रुग्ण खाटांची संख्या 930 करण्यात येणार असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सध्या स्थितीत दोन इमारती म्हणजेच रेडिएशन रिसर्च युनिट आणि महिला आणि मुलांचे कर्करोग केंद्र कार्यान्वित केले गेले आहेत. त्यामुळे बेडची संख्या साधारणतः 400 एवढी आहे. वाढती रुग्णसंख्या आणि आधुनिक तंत्रप्रणाली उपचार लक्षात घेता हेमॅटोलिम्फॉइड कॅन्सर सेंटर, ब्लड कॅन्सरच्या रुग्णांची पूर्तता करणारे देशातील सर्वांत मोठे केंद्र या ठिकाणी सन 2024च्या अखेरीस कार्यान्वित केले जाणार आहे. त्या अनुषंगाने या रुग्णालयातील 19 ऑपरेशन थिएटरमुळे दरवर्षी अंदाजे 10 हजार मोठ्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया आणि पाच हजार रुग्णांना रेडिएशन थेरपी, 25 ते 30 हजार रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकणार असून जवळपास तीन लाख 20 हजार रुग्ण औषधोपचार घेऊ शकणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाचा विचार केला असता या ठिकाणी सद्यस्थितीत सर्व श्रेणीतील एकूण 1067 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये आता वैद्यकीय, नर्सिंग, तंत्रज्ञ, सुरक्षा, हाऊसकीपिंग आणि प्रशासकीय अशा सर्व श्रेणींमध्ये भर पडून ती संख्या 2405 कर्मचार्‍यांची होणार आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हे सर्व परिवार मोदी सरकारला दुवा देणार आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक नरेश ठाकूर, तसेच अमर उपाध्याय व किर्ती नवघरे हेही उपस्थित होते.

कर्करोग रुग्णांची परिस्थिती आणि उपचार या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि मी टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने नोव्हेंबर 2022मध्ये आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वाढीव रुग्ण बेड आणि मनुष्यबळाची मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या तीन महिन्यांत मोदी सरकारने तातडीने निर्णय घेतला. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य गरिबाला आणि समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या निर्णयाने आम्ही आनंदित झालो असून आभार व्यक्त करतो. -आमदार महेश बालदी

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply